- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : सन २०२२-२३ या वर्षाकरीता “ राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा ” राबविण्यात येत आहे. अभियान कृती कालावधी प्रतिवर्षी दिनांक २० ऑगस्ट ते २ ऑक्टोबर असेल. स्पर्धेचा कालावधी २० ऑगस्ट पासून एक वर्षाचा असेल. प्रशासकीय सुधारणेविषयी प्रस्ताव व कल्पना यासाठी मात्र कालावधीची अट नसेल.
उपविभागाचे मुख्यालय असलेल्या तालुक्याच्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी आणि इतर तालुक्यात तहसिलदार हे तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी व गटविकास अधिकारी यांना निमंत्रित करतील व तालुका स्तरावरील अधिका-यांच्या सभेमध्ये प्रगती अभियानाची संकल्पना मांडतील.
जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावून जिल्हयातील सर्व संसद सदस्य, विधानसभा/विधानपरिषद सदस्य, अध्यक्ष, जिल्हा परिषद यांना निमंत्रण करतील. या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद तसेच इतर जिल्हा स्तरावरील सर्व विभागप्रमुख यांना बैठकीत निमंत्रित करतील व या योजनेमध्ये सर्वाच्या सहभागाबाबत आवाहन करतील.
महागनगरपालिकास्तरावर महानगरपालिका आयुक्त, नागरी संस्थांचे सर्व विभाग प्रमुख यांची बैठक घेऊन योजनेमध्ये सर्वाच्या सहभाग असेल. महापौर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करून संसद सदस्य विधानसभा/विधानपरिषद सदस्य, नगरपालिकेचे महानगरपालिकेचे पदाधिकारी यांनाही बैठकीत आमंत्रित करतील.
विभागीय स्तरावर विभागीय आयुक्त, सर्व विभाग प्रमुख यांची बैठक घेऊन योजनेमध्ये सर्वाच्या सहभागाबद्दल आवाहन करतील. हे अभियान सर्व स्तरावर राबविण्याचे अनुषंगाने जिल्हा, महानगरपालिका स्तर व तालुका स्तरावर शासन निर्णय दि.३ फेब्रुवारी २०२१ मधील तरतुदी अभ्यासुन तसेच सदर शासन निर्णयामध्ये विहीत केलेल्या वेळापत्रकानुसार कार्यवाही करावी. सर्वच शासकीय/निमशासकीय कार्यालयाचा या अभियानामध्ये सहभाग नोंदवावा. असे विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पाढरपट्टे यांनी कळविले आहे.
* हे वाचा – नवनीत राणांचा लव्ह जिहादचा दावा खोटा?, मुलीचा पोलिसांना जबाब