अमरावती (प्रतिनिधी) : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त आयोजित छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी त्यांनी हे प्रदर्शन आजच्या तरुणांसाठी महत्त्वाचे असल्याचे सांगितले. आपल्याला स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेले नाही, त्यासाठी लाखो लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. हा इतिहास आपण लक्षात ठेवला पाहिजे आणि आपल्या देशाच्या हितासाठी सदैव कटिबध्द असले पाहिजे. डॉ. पांढरपट्टे यांनी दुर्मिळ चित्र प्रदर्शन आयोजित केल्याबद्दल केंद्रीय संचार ब्यूरो विभागाचे अभिनंदन केले.
यावेळी उपस्थित संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिलीप मालखेडे यांनी प्रदर्शनात सुभाषचंद्र बोस यांचे चित्र व त्यांची माहिती केंद्रस्थानी ठेवून विद्यार्थ्यानी आझाद हिंद सेनेसारखी विदयापीठ सेना बनवून समाजसेवा करण्याचे आवाहन केले. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत केंद्रीय संचार ब्यूरोने शासकीय विभागीय ग्रंथालयाच्या सहकार्याने हे प्रदर्शन ग्रंथालयाच्या सभागृहात आयोजित केले आहे. हे प्रदर्शन दिनांक 10 ते 12 ऑगस्ट 2022 दरम्यान सकाळी 10 ते संध्याकाळी 06 पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य असेल.
याप्रसंगी क्षेत्रीय प्रचार अधिकारी इंद्रवदनसिंह झाला, विभागीय ग्रंथपाल अरविंद ढोणे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ.सूरज मडावी, प्रा. डॉ.रामेश्वर भिसे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.पूनम चौधरी, डॉ.मंदा नांदूरकर यांच्यासह विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन क्षेत्रीय प्रचार सहाय्यक अंबादास यादव यांनी केले तर आभार डॉ.राजेश बुरंगे, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना यांनी मानले.
अमरावतीचे आमदार प्रवीण पोटे व धामणगावचे रेल्वेचे आमदार प्रतापराव अडसड यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन येथे लावलेली चित्रे पाहिली. हे प्रदर्शन सर्वांना इतिहास समजून घेण्याची चांगली संधी देत असल्याचे त्यांनी सांगितले. अधिकाधिक लोकांनी आणि विशेषत: विद्यार्थी, तरुणांनी हे नक्की पाहावे. असे आवाहन केले.या प्रदर्शनात अमरावती जिल्ह्यातील हुतात्म्यांसह देशभरातील प्रसिद्ध अनामिक स्वातंत्र्यसैनिक, हुतात्म्यांच्या माहितीसाठी स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या