गुरुकुंज आश्रम: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्य "हर घर तिरंगा" अभियान साजरे केले जात असतांना अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या महाद्वारावर ८७ वर्षांनंतर प्रथमच भगवी पताका बाजूला करून त्याजागी तिरंगा ध्वज फडकविण्यात आला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ४ एप्रिल १९३५ रोजी गुडीपाडव्याला अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाची मुहूर्तमेढ गुरुकुंज येथे रोवली तेव्हा सर्वप्रथम भगवी पताका फडकविण्यात आली होती. त्यांनतर जेव्हा राष्ट्रसंत दौऱ्या निमित्य देश विदेशात भ्रमण करीत असत तेव्हाच महाद्वारावरील भगवी पताका अर्ध्यावर आणली जात असे व जेव्हा राष्ट्रसंत आश्रममध्ये दौऱ्यावरून परत येत तेव्हाच अर्ध्यावरील पताका उंच फडकविण्यात येत असे.
राष्ट्रसंतांचे महानिर्वाण ११ ऑक्टोबर १९६८ रोजी झाले तेव्हा पासून आश्रमिय महाद्वारावरील भगवी पताका राष्ट्रसंत कार्यरुपाने आश्रमात सदैव वास करीत आहे असे समजून अविरत फडकलेली असते,कधीच भगवी पताका अर्ध्यावर अथवा खाली काढून ठेवली जात नाही.परंतु देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात राष्ट्रसंतांनी भाग घेतला होता तेव्हा त्यांनी "पत्थर सारे बॉम्ब बनेगे भक्त बनेगी सेना" हे भजन म्हटल्याने इंग्रजांनी २८ आगस्ट १९४२ रोजी चंद्रपूर येथून महाराजांना अटक करून नागपूर जेल येथे व नंतर सप्टेंबर १९४२ मध्ये नागपूर येथून रायपूर येथिल मध्यवर्ती कारागृहात डांबून ठेवले होते.
त्यानंतर १९६५ मध्ये भारत चीन युद्धात प्रत्यक्ष नेफा बॉर्डरवर जाऊन राष्ट्रसंतांनी "तैयार हुआ हिंद तुम्हारे साथ,आवो चिनिओ।मैदानमे देखो हिंद का हाथ अशी एकापेक्षा एक जाज्वल्य देशभक्तीने ओतप्रोत अनेक देशभक्तीपर भजनांचे गायन करून सैनिकांचे मनोबल वाढविले. तेव्हा हे भजन खूप गाजले होते.अपनी शान को मान नहीं जब देश की शान बिखर जावे असे राष्ट्रसंतांनी आपल्या गद्य रचनेत सुद्धा लिहिले आहे आज राष्ट्रसंताच्या राष्ट्रभक्तीचे स्मरण प्रत्येकाला होत आहे.समपूर्ण राष्ट्र स्वातंत्र्याचा अमृतहोत्सव साजरा करीत असतांना अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाने ८७ वर्षापासून आश्रमावरील अविरत फडकत असलेली भगवी पताका बाजूला फडकवून त्याजागी मोठ्या दिमाखात तिरंगा फडकविला,हा फडकलेला तिरंगा पहातांना राष्ट्टसंत तुकडोजी महाराजांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाची साक्ष ठरत आहे.
राष्ट्रसंतानी आष्टी,चिमूर स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला.१९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी१९४२ मध्ये काही दिवसांसाठी चिमूर ब्रिटिश राजवटीतुन स्वातंत्र्य झाले होते. त्यात महाराजांना अटक झाली होती राष्ट्रसंत स्वातंत्र्य सैनिक होते, थोर पुरोगामी व देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देणारे संत होते.प्रथम देश मग धर्म, अशी महाराजांची शिकवण होती त्याचेच आज पालन करून आश्रमवरील भगवी पताका बाजूला फडकवून त्याजागी सर्वात उंचावर तिरंगा ध्वज फडविण्यात आला आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या