- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवांतर्गत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम दि. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत (माविम) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात ‘झेंडा विक्री केंद्रा’चा शुभारंभ जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या हस्ते आज झाला.
निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल, महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व महिला बचत गटाच्या महिलाभगिनी यावेळी उपस्थित होत्या.‘माविम’च्या माध्यमातून झेंडा विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. बचत गटातील महिलाभगिनींनी माविमच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू केला. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त घरोघरी तिरंगा फडकावा, यासाठी अनेक ठिकाणी झेंडे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तशी केंद्रेही ठिकठिकाणी सुरु होत आहेत. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी प्रत्येक घरावर तिरंगा लावून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी यावेळी केले.
उपक्रमाबाबत गावोगाव जनजागृतीही होत आहे. विविध कार्यालये, संस्था यांचा सहभाग उपक्रमात मिळत आहे. झेंड्याची सर्वत्र उपलब्धता असण्यासाठी तालुकास्तरारही केंद्रे सुरू होत आहेत, असे निवासी उपजिल्हाधिकारी श्री. बिजवल यांनी सांगितले.