- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील मातंग समाजाच्या युवकांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची स्थापना केली आहे. या माध्यमातून मातंग समाजातील 12 पोटजातीतील लोकांना आर्थिक सहाय्य दिले जाते. याअंतर्गंत बीज भांडवल योजना व अनुदान योजनेसाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
- बीज भांडवल योजना
चालु आर्थिक वर्षात बीजभांडवल योजनेतंर्गत जिल्ह्याला पन्नास हजार एक रुपयांपासून सात लाखांपर्यंत 30 कर्ज प्रकरणांची उदि्दष्ट्ये देण्यात आली आहेत. यामध्ये महामंडळाचा सहभाग अनुदानासह 20 टक्के, लाभार्थी सहभाग 5 टक्के तसेच बँकेचा कर्जाचा सहभाग 75 टक्के एवढा आहे. महामंडळाच्या बीजभांडवल रकमेवर 4 टक्के व्याजदर आकारण्यात येत असून बँकेच्या कर्ज रकमेवर बँकेचा व्याजदर असतो. अनुदान योजनेतंर्गत 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज प्रस्ताव बँकेला पाठविण्यात येतात. त्यामध्ये महामंडळाचे 10 हजार रुपये अनुदान असून उर्वरित कर्ज बँकेचे असते. या योजनेतील 100 कर्ज प्रकरणाचे उद्दिष्ट्ये प्राप्त झाली आहेत.
- अनुदान योजना
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा मातंग समाज व त्यातील 12 पोटजातीपैकी असावा. वयोमर्यादा 18 ते 50 वर्षे असावी. कर्ज प्रकरणासोबत जातीचा तसेच उत्पन्नाचा दाखला, अलिकडच्या काळातील छायाचित्र, रेशनकार्ड, आधारकार्ड, मतदान कार्ड, घरटॅक्स पावती, कोटेशन, ज्या ठिकाणी व्यवसाय सुरु करावयाचा आहे, त्या जागेचा पुरावा इत्यादी कागदपत्रासह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ विकास महामंडळ (मर्यादित) डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पोलीस आयुक्त कार्यालयाच्या मागे,चांदुररेल्वे रोड, अमरावती येथे कार्यालयीन वेळेत येऊन कर्ज प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एस.व्ही.राचर्लावार यांनी केले आहे.
0 टिप्पण्या