मुंबई : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत ६ लाख ७६ हजार ८०३ मते मिळवून एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या आहेत. त्यांच्या विजयानंतर देशाला १५ व्या तसेच पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती मिळाल्या आहेत. देशाच्या सर्वोच्च पदावर निवडून आल्याने मुर्मू सर्व समाजातील नागरिकांना न्याय देतील, असा विश्वास इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शुक्रवारी व्यक्त केला.आदिवासी समाजातून येणार्या त्या पहिल्या राष्ट्रपती असल्याने समाजबांधवांना त्या न्याय देवून त्यांच्या समस्यांची सोडवणूक करतील.यासोबतच देशातील सर्व पक्ष, विरोधक आणि नागरिकांना समाजसेविका मुर्मू यांच्या सेवाभावाचा देशाला नक्कीच फायदा होईल,असे पाटील म्हणाले.
झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल मुर्मू यांचा संघर्ष प्रेरणादायी आहे.त्यांच्या संघर्षमय जीवनप्रवासातून देशवासियांना खऱ्या अर्थाने यानिमित्ताने प्रेरणा घेता येईल,असे पाटील म्हणाले. मुर्मू यांचे आयुष्य,त्यांचा संघर्ष, त्यांची सेवा आणि यश हे प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे.त्या देशाच्या नागरिकांसाठी विशेषतः गरीब, शोषित आणि वंचितांसाठी आशेचा किरण बनल्या आहेत.पोटीची तीन पोर गमावल्यानंतर, पतीच्या निधनानंतर न खचता मुर्मू यांनी समाजकारणासाठी आपले जीवन समर्पित केले. १९९७ मध्ये त्यांनी राजकीय कारकीर्दीची सुरूवात केली.तदनंतर त्या रायरंगपूर नगरपरिषद निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आल्या आणि नगरपरिषदेच्या उपाध्यक्षा झाल्या.
रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातून त्या भाजपच्या तिकिटावर २००० आणि २००९ साली दोनदा आमदार म्हणून निवडून आल्या. पहिल्यांदा आमदार असतांना त्या नवीन पटनायक यांच्या मंत्रिमंडळात स्वतंत्र प्रभारासह राज्यमंत्री होत्या. २०१५ मध्ये त्या मयूरभंज जिल्ह्याच्या भाजपच्या अध्यक्षा असतानाच त्यांना पहिल्यांदा राज्यपाल बनवण्यात आले. २००६ ते २००९ पर्यंत त्या भाजपच्या एसटी (अनुसूचित जाती) मोर्चाच्या ओडिशा प्रदेशाध्यक्ष देखील होत्या. राजकारणात आपल्या समाजकारणाचा ठसा उमटवणाऱ्या मुर्मू देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदाला विशेष न्याय देतील, अशी भावना यानिमित्ताने पाटील यांनी व्यक्त केली.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या