मोर्शी : महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी मंत्री तथा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धनजी देशमुख यांना ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार’ घोषित झाला असून पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबई तर्फे ८ जुलैला गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्याचे माजी कृषिमंत्री तथा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. हर्षवर्धजी देशमुख यांना त्यांच्या उत्कृष्ट व सामाजिक कार्यातील योगदानाबद्धल पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबईने ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार’ घोषित केला असून दि.८ जुलै रोजी मुंबई येथे एका समारंभात हा पुरस्कार प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ७७ वर्षांपूर्वी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती.दि.८ जुलैला या संस्थेचा ७७ वा वर्धापन दिन असून त्यानिमित्ताने मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट येथील पदवीदान सभागृहात आयोजित भव्य समारंभात राज्यपाल मा.भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते श्री.हर्षवर्धनजी देशमुख यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार’ हा शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार असून श्री.हर्षवर्धनजी देशमुख यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून गेल्या पाच वर्षात संस्थेच्या माध्यमाने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याचा हा गौरव आहे. या पुरस्काराबद्धल मोर्शी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी हर्षवर्धनजी देशमुख यांचे अभिनंदन केले आहे.