दूषित पाणी बाधा प्रकरणी मृतांच्या कुटुंबियांना ‘प्रहार’कडून एक लाखाची मदत – आमदार बच्चूभाऊ कडू

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    धारणी, : मेळघाटातील दूषित पाणी बाधा प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार राजकुमार पटेल यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत तात्काळ जाहीर करत असल्याचे सांगितले. माजी राज्यमंत्री तथा आमदार बच्चूभाऊ कडू यांनीही या कुटुंबांना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत ‘प्रहार’च्या वतीने जाहीर केली आहे.

    चिखलदरा तालुक्यातील अतिदुर्गम पाचडोंगरी व कोयलारी गावांमधील पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित झाल्याने व पिण्यासाठी पाणी उपलब्ध न झाल्याने नाइलाजाने स्थानिक नागरिकांना वापरात नसलेल्या विहिरीचे पाणी पिण्याची वेळ आली. त्यामुळे तिथे अतिसाराची साथ पसरली. या घटनेची माहिती मिळताच आमदार श्री. कडू व श्री. पटेल यांनी तत्काळ जिल्हा स्तरावरील अधिका-यांना माहिती देऊन ताबडतोब उपचार व उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख मदत जाहीर केली. त्याचप्रमाणे, प्रहार पक्षाच्या वतीने प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

    आमदार श्री. पटेल यांनी पाचडोंगरी व कोयलारी गावाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. रुग्णांवर योग्य उपचार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. या परिसरात साथ रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना तत्काळ करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. आवश्यक ती सर्व मदत व सहकार्य करू, असेही त्यांनी सांगितले. त्यांनी आजारी रुग्णांच्या उपचाराची माहिती घेऊन त्यांच्याशी संवाद साधला व मृतांच्या कुटुंबांना प्रहार जनशक्ती पक्षातर्फे प्रत्येकी 1 लक्ष रुपये आर्थिक मदत केली व आजारी रुग्णांना शक्तीवर्धक किटचे वितरण करण्यात आले. वाढीव मदत मिळण्यासाठीही आपण शासन स्तरावर प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले. यावेळी राजेश सेमलकर, देविदास कोगे,मोंग्या बेठेकर,सुनिल उईके, कमलेश राठोड,संदिप अलोकार,मनोज बेलकर,कालु अखंडे, सुभाष आमोदे आदी उपस्थित होते.