- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : समाजकल्याण विभागाच्या अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील एकूण 73 शासकीय वसतिगृहांत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यानुसार शालेय विद्यार्थ्यांनी दि. 15 जुलैपर्यंत व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनी दि. 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन प्रादेशिक समाजकल्याण उपायुक्त सुनील वारे यांनी केले.
विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांत प्रवेशित अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील शालेय विद्यार्थी, इयत्ता 10वी व 11वी उत्तीर्ण, तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील इतर शैक्षणिक व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळेल. त्याचप्रमाणे, तालुका स्तरावर मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांत इयत्ता 8वी पासून ते पुढील अभ्यासक्रमांकरिता प्रवेश अर्ज वाटण्यात येत आहेत.
शालेय विद्यार्थ्यांसाठी दि. 15 जुलै, इयत्ता 10 वी नंतरच्या विद्यार्थ्यांसाठी दि. 30 जुलै, कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतील अभ्यासक्रमांकरिता प्रथम वर्षाचे पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज करण्याची मुदत दि. 24 ऑगस्ट आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना दि. 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज देता येईल.
वसतिगृहात विद्यार्थ्यांना नाश्ता, भोजन, निवासाची सोय, शैक्षणिक साहित्य तसेच निर्वाह भत्ता देण्यात येतो. विद्यार्थ्यांना ज्या वसतिगृहांत प्रवेश घ्यायचा असेल तेथूनच अर्ज मिळवून आवश्यक त्या कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज करावा, असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त श्री. वारे यांनी केले.