Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ शाहू महाराज

    शैक्षणिक, सांस्कृतिक, अर्थिक सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिन २६ जुन हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. राजर्षी शाहू महाराज यांचा २ एप्रिल १८९४ रोजी राज्याभिषेक झाला. व छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे वयाच्या २० व्या वर्षी कोल्हापूर संस्थानाचे राजे झाले. दिनदुबळ्या समाजाचे लोकराजा झाले. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे शिक्षण राजकोट व धारवाड येथे झाले.

    सर फ्रेझर व रघुनाथराव सबनीस यांसारखे त्यांना मार्गदर्शक मिळाले. त्यांनी समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी अधिक भर दिला आहे. त्यासाठी त्यांनी कोल्हापुर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली. व समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षण मिळावे. यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रसार केला. त्यांनी शैक्षणिक कार्यास प्रोत्साहन देण्यासाठी अनेक शैक्षणिक कार्यक्रम सुरू केले.विविध जाती धर्मातील लोकांसाठी वेगवेगळे वसतिगृह सुरू केले. समाजातील विविध घटकांतील लोकांना एकत्र शिक्षणासाठी मिक्स क्लार्क स्कुलची स्थापना केली. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी व गुणवंत विद्यार्थींसाठी त्यांनी अनेक शिष्यवृत्ती दिल्या व चालु केल्या.

.

    राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात चित्रपट, संगीत, चित्रकला, शिल्पकला, कुस्ती व लोककला या क्षेत्रांतील कलावंतांना मदत केली. कला, संस्कृतीला राजाश्रय देवुन ती उदयास आणली. तर बालगंधर्व केशवराव भोसले यांसारखे थोर कलावंत या महाराष्ट्राला दिले. मल्लविद्येच्या क्षेत्रातील सर्व मल्ल यांना आश्रय दिला. रोमच्या आखाड्याच्या धर्तीवर त्यांनी खासबाग कुस्तीचे मैदान बांधुन कोल्हापूर हि मल्लविद्येची पंढरी बनवली.

    अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी शाहु महाराजांनी कोल्हापूर नगरीत सन १९०५ मध्ये १५ लाख रुपये भांडवल उभारुन पहिली सुतगिरणी स्थापन केली. तर १९१२ मध्ये रायबाग येथे श्री शाहू विणकरी संघटना स्थापन केली. शेणगाव गारगोटी येथे काताचा कारखाना सुरू केला. राधानगरी येथे वुड डिस्टिलेशन फॅक्टरी सुरू केली. कोल्हापूर शाहुपुरी हि मोठी बाजारपेठ बसवली. शाहुपुरी हि गुळाच्या बाजारपेठेची निर्मिती केली. शेतकऱ्यांच्या सहकारी संस्थांची स्थापना केली. राधानगरी धरणाची निर्मिती केली. शेती, उद्योग, सहकार क्षेत्रात शाहू महाराजांनी नवनवे प्रयोग यशस्वीपणे पूर्ण केले.

    शाहू महाराजांनी कोल्हापूर, बेळगाव या भागातील स्वातंत्र्यवीरांना वेळोवेळी आर्थिक मदत केली. शाहु महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध तर सर्वांनाच माहित आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शाहू महाराजांनी शिष्यवृत्ती दिली. व डॉ. बाबासाहेब आंबेडकर. यांनी ३१ जानेवारी १९२० रोजी 'मुकनायक' साप्ताहिक सुरू केले. परंतु काही काळानंतर ते बंद पडले. तेव्हा शाहु महाराजांनी २५०० रुपयांची मदत करुन मुकनायकाला जीवदान दिले.शाहु महाराजांनी समतेवर आधारित राज्य स्थापन केले.

    सामाजिक, अर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यामुळे शाहू महाराजांची प्रतिमा जनमानसांच्या मनात दीनदुबळ्यांचा पाठीराखा, उद्धारक रयतेचा राजा, लोकराजा अशी ख्याती सर्वदूर पसरली. त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून त्यांना कानपुर येथील कुर्मी क्षत्रिय समाजाने त्यांना राजर्षी हि पदवी बहाल करुन त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. वयाच्या ४८ व्या वर्षी लोकराजानं राजर्षी पदवी सार्थ केली. असे कोल्हापूर संस्थानाचे राजे,दीनदुबळ्यांचा पाठीराखा,बहुजनांचा पुढारी थोर समाजसुधारक, लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना त्रिवार वंदन...!

    -प्रविण खोलंबे.
    ता.मुरबाड जि.ठाणे.
    संपर्क - ८३२९१६४९६१

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code