अमरावती (प्रतिनिधी) :‘माझी वसुंधरा अभियान 2.0’मध्ये अमरावती जिल्ह्याने सर्वाधिक बक्षीसे मिळवत विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका व महापालिका या चारही वर्गातील स्थानिक स्वराज्य संस्थांना पुरस्कार मिळाला आहे.
जिल्हा प्रशासनाच्या अचूक नियोजनाचे हे यश मानले जात आहे. जिल्हाधिकारी पवनीत कौर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या निर्देशानुसार नगर प्रशासन व जि. प. प्रशासनाकडून अभियानाची जिल्ह्यात परिणामकारक अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील चार स्थानिक स्वराज्य सन्मान प्राप्त झाला आहे. याबाबत राज्यस्तरीय बक्षीस समारंभ नुकताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत झाला.
अभियानात अमरावती महापालिकेला अमृत गटात प्रथम बक्षीस प्राप्त झाले. शेंदुरजना घाट नगरपालिकेला न. प. गटात प्रथम, तर नगरपंचायत गटात नांदगाव खंडेश्वरला प्रथम बक्षीस मिळाले. दहा हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायत गटात वरूड तालुक्यातील जरूड ग्रामपंचायतीला पारितोषिक मिळाले.
अमरावती जिल्हा विभागातून सगळ्यात जास्त बक्षीसे मिळवत अव्वल ठरला आहे. जिल्ह्यातील एक नगरपालिका, एक नगरपंचायत, एक महानगरपालिका व एक ग्रामपंचायत अशा सर्व प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. ही कामगिरी यापुढेही कायम ठेवून स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे पर्यावरण संवर्धनाच्या सातत्यशील सहभाग यापुढेही ठेवावा, अशी सूचना जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी केली.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या