ऐतिहासिक वारसा ……!

    पुर्वजांनी निर्माण केलेला
    ऐतिहासिक वारसा ध्दव्स्त करत
    त्यांनी त्यांच बस्तान मांडलं
    नी इतिहासाचे विद्रुपिकरण करून
    आमच्यावर गुलामगिरी लादली
    तेव्हापासून आजतागायत
    आम्ही लढत आहोत माणुसकीचे युध्द
    ज्यात आमच्या कित्येक पिढ्या गारद झाल्या …..

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
    वास्तवतः संशोधनाअंती सिध्द झाल्यावरही
    आम्ही कुठल्याच बाबिंवर केला नाही दावा
    वा धर्मांध होऊन उतरलो नाही रस्त्यावर
    कारण रोहिणीच्या पाण्यावरून पेटलेल्या
    युध्दाला शमवण्यासाठी
    राजपाटाचा त्याग करणाऱ्या
    सम्यक सम्बुध्दाचे आम्ही उपासक आहोत
    आम्हांला आजही नको आहे धर्मयुध्द
    युध्दाने सुटणार नाहीत कुठलेही मुलभूत प्रश्न
    यावर आम्ही ठाम आहोत ……

<

    खरं तर ….
    आजही आमच्या पाठीचे कणे ताठ आहेत
    नी लढण्याची उर्जा आणि उर्मी कायम आहे
    पण कशासाठी लढावं?
    याचे भान आमच्यात आले आहे
    उठसूठ रस्त्यावर उतरून
    माणसांना वेठीस धरणे आम्हांला मान्य नाही
    पण वेळ आलीच तर
    एकदाच लढू आरपारचे युध्द
    तोवर तुम्ही गर्जत राहा
    आम्ही आमचे शस्ञ परजतो …….

    गड्यांनो ……,
    तृष्णेने खवळलेल्या सागरात
    सापडत नाहीत करूणेचे मोती
    एवढं कळलं की
    सारेच पोळलेले निळ्या बेटावर जमा होतील
    नी एका सुरात निळ्या नभाचे गीत गातील …….
      -गणेश लांडगे
      (साभार फेसबुक)