अंगणवाड्यांना कायमस्वरूपी जागा मिळण्याबाबत कार्यवाही करावी- खासदार नवनीत राणा

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
    * दिशा समितीच्या बैठकीत विविध विषयांचा आढावा
    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील अनेक अंगणवाड्या भाडेतत्त्वावरील इमारतीत असून, त्यांना जागा मिळवून द्यावी. तसे प्रस्ताव घेऊन महापालिका, जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांनी कार्यवाही करावी. समाजमंदिर व इतर ठिकाणी असलेल्या अंगणवाड्यांचाही समावेश करावा. अंगणवाड्यांना कायमस्वरूपी जागा मिळाल्यास बालकांसाठी महत्वाची शैक्षणिक सुविधा निर्माण होईल, असे निर्देश खासदार नवनीत राणा यांनी दिशा समितीच्या बैठकीत आज दिले.

    जिल्हा विकास समन्वय (दिशा) समितीची आढावा बैठक खासदार श्रीमती राणा यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनभवनात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी पवनीत कौर, महापालिका आयुक्त प्रविण आष्टीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा व विविध विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.

    खासदार श्रीमती राणा म्हणाल्या की, अंगणवाडीच्या माध्यमातून बालके, गर्भवती व स्तनदा माता यांना आरोग्यविषयक दर्जेदार सुविधा पुरविण्यास प्राधान्य द्यावे. विशेषत्वाने मेळघाटातील धारणी व चिखलदरा या दोन्ही तालुक्यांत कुपोषण निर्मूलनासाठी या माध्यमातून प्रभावी उपाययोजना व्हावी. बालकांची नियमित तपासणी, कुपोषण आढळणाऱ्या बालकांना तातडीने आरोग्य केंद्रात दाखल करुन विशेषोपचार आदी प्रक्रिया जबाबदारीने पूर्ण करावी. पावसाळी साथीचे आजार रोखण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

    ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीची गरज लक्षात घेऊन जलसंधारण, शेततळे, विहीरी, रस्तेविकासाच्या कामांतून अधिकाधिक रोजगारनिर्मिती करावी. मेळघाटात मनरेगातील कामे व्यापकपणे राबवावीत. केंद्रिय सामाजिक सहाय्यता योजनेत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, विधवा निवृत्तीवेतन योजना, अपंग निवृत्तीवेतन योजना व राष्ट्रीय कुटुंबलाभ योजनेतील लाभार्थ्यांना देण्यात येणारे अनुदान तत्काळ त्यांच्या खात्यात जमा करावे. मार्चनंतरचे अनुदान प्राप्त करुन घेण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करावा, असे निर्देश श्रीमती राणा यांनी दिले.

    प्रधानमंत्री आवास योजनेत मनपा क्षेत्रातील 9 हजार घरकुलांच्या निर्मितीकार्याचा आढावा त्यांनी घेतला. त्यात 2 हजार 700 घरकुलांचे काम पुर्ण झाले असुन 1 हजार 533 घरकुलांचे बांधकाम सुरु आहे. ग्रामीण आवास योजनेत पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी योजना व्यापकपणे राबवा. पात्र लाभार्थी घरकुलापासुन वंचित राहू नये, असे निर्देश श्रीमती राणा यांनी दिले.

    स्वच्छ भारत अभियानात वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतागृहांची निर्मिती, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, भू-अभिलेख आधुनिकीकरण, शालेय माध्यान्ह भोजन योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना आदी विविध योजनांचा आढावा बैठकीत घेण्यात आला.