झोळी आत्मकथन.. मला स्वतः च्या मनाला चटका लावून गेले. साहित्य क्षेत्रात कार्यरत लेखक, साहित्यीक, कवी, समीक्षक, प्राध्यापक, वाचक ,विद्यार्थी यांची आकलन वेगवेगळे अर्थ काढून मांडणी करण्याचा प्रयत्न करत आहेत.सरांनी अत्यंत मार्मिक झोळी आत्मकथन पर कादंबरीला साजेशी प्रतिक्रीया नोंदवली आहे. ती मला विशेष भावली आहे. ती आतून लिहलेली आहे त्यामुळे वास्तव दर्शन अधिक व्यापक अर्थाने विचार करून बघावा यासाठी मदत होते. सरांचे व्यापक आकलन वाचून दुसऱ्या आवृत्तीची प्रस्तावना सरांनी लिहावी असे वाटते आहे.....
झोळी आत्मकथन वाचकाला अंतर्मुख करणारे लेखन. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतांना तळागाळातल्या समाजाला कितपत न्याय मिळाला असा प्रश्न उपस्थित होतो. पारंपारीक व्यवसायाप्रमाणे आपली उपजिविका भागविणारा नाथपंथी डवरी गोसावी समाज आजच्या काळात कुठल्या स्थितीत वावरतो आहे. याचं विदारक चित्र झोळी आत्मकथनातून प्रत्ययास येतं. कृषी संसकृतीचा -हास होताना हा समाज झपाटयानं वाढणा-या शहरीकरणाच्या लाटेत वाहवत गेला.
गावखेड्यात कृषी संस्कृती मुळ धरुन होती तेव्हा भटक्या समाजाचा गाडा त्यावर हाकला जात होता. बळीराजाचे पाठिराखे आणि देणेकरी म्हणून त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन निकोप होता. खळ्यावर साचलेल्या राशीतून त्यांना भरभरुन दान दिलं जात असे. भविष्याविषयी दोहोही सतर्क नव्हते. आणि दानाने बरकत येते असा समजही रुढ होता. अवघा समाज गुण्यागोविंदानं नांदत होता. पुढे निसर्गात चमत्कारीक बदल झाले आणि त्याची पहिली झळ बसली ती शेती क्षेत्राला. झोळीत भिक्षा टाकणा-या अन्नदात्यावरच विन्मुख व्हायची वेळ गुदरल्याने त्याला उदरनिर्वाहासाठी शहराकडे स्थलांतर करावे लागले. तालेवार घराण्याला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागल्या. शेती व्यवसाय करणा-यांना उत्पादन खर्च भागेना. मजूराचा खर्च वाढला. याचा अनिष्ट परिणाम उत्पादनावर झाला. परिणामी शेतक-यांवर अवलंबून असलेला समाज, बलुतेदार, आलुतेदार, गोसावी, गोंधळी, वासुदेव, बहुरुपी इत्यांदींवर गंडांतर आले. त्यांना मदत होईनासे झाली. काही समाजाने पारंपारीक व्यवसाय सोडून उपजिविकेसाठी वेगळया वाटा धरल्या. काही प्रमाणात तो यशस्वीही झाला.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या