अशाप्रकारची गीते आपणाला नट्यांच्या सौंदर्याचीतारीफ करतांना कानावर पडतात किंवा टी. व्ही./ मोबाईलवर दिसत असतात. एकंदर मतितार्थ असा निघतो की बाह्य सौंदर्याला मोहित होऊन किंवा प्रेमात पडून नट नटींचे कौतुक करीत असतो. आपणसुद्धा जाणते व अजाणतेपणे जे काही आपल्या आजूबाजूला घडत असते त्याचे अनुकरण करत असतो. आपणसुद्धा बाह्य सौंदर्याला बळी पडत असतो.
ह्या बाह्य सौंदर्याला आकर्षित होऊन इतिहासामध्ये बऱ्याच घटना घडलेल्या आहेत. बऱ्याच प्रेमकथा आहेत. बरीच प्रेमविवाह झाली आहेत. पण कालांतराने जे बाह्य सौंदर्याला बघून प्रेमविवाह करतात काही जणांचे नंतर वाद होऊन त्यांचा संसार पूर्णत्वाकडे जात नाही अशा सुद्धा आपल्याला काही गोष्टी कानावर येतात. हे वाद विवाद का होतात? काय कालांतराने बाह्य सौंदर्याची जादू ओसरते की काय? असो.
एक बुद्धकालीन सुरेखशी घटना आपल्याला माहीतच आहे. ती अशी आहे की, भगवान बुद्धांचा आवडता शिष्य आनंद एकदा विहार करतांना त्यांना तहान लागते. काही वेळाने आनंद एका विहिरीजवळ पोहचतात. त्याठिकाणी पाणी भरत असणाऱ्या कन्येला आपली तृष्णा भागविण्यासाठी पाणी मागतात. परंतु त्ती तरुणी आपण अस्पृश्य आहोत व आपल्या हातचे पाणी चालेल का ? असा आनंदला उलट प्रश्न करते. आनंद म्हणतात की मला आता तहान लागलेली आहे मला पाण्याची गरज आहे ना की तू कुठल्या जातीची आहे हे बघण्याची. कुठल्याही जातीची असली तरी पाण्याचा जो गुणधर्म आहे तो तेच राहणार आहे. मग ते पाणी कोणीही देवो. मग तू ऊच्च वर्णीय असो की कोणीही पण.
हा संवाद जेव्हा त्या तरुणीचा आनंदशी होतो तेव्हा त्या तरुणीचे लक्ष आनंदच्या सौंदर्याकडे जाते आणि ती त्याच्या प्रेमात पडते व मनोमन त्याला आपला समजून त्यांच्या सोबत विवाह करण्याचा इरादा करते. ही गोष्ट चंडालिका प्रकृती तिच्या आईला सांगते. तिची आईसुद्धा प्रकृतीच्या इराद्याला होकार देते.मग ती तरुणी आंनदला आपल्या घरी भोजनाचे आमंत्रण देते व पंचपक्वानाचे जेवण आनंदला देते. ह्या भोजनाच्या अवधीपर्यन्त त्या तरुणीची आई आनंदला मोहित करण्याचा खूप प्रयत्न करते. परंतु त्यात ती काही यशस्वी होत नाही.
मग ती प्रकृती आनंदचा पाठलाग करून भगवान बुद्धाकडे जाते व भगवान बुद्धांना त्यांच्या धम्मात प्रवेश करण्याची विनंती करते मग भगवान बुद्ध तिला धम्मात येण्याचे कारण विचारतात. तेव्हा ती मुलगी खरे खरे सांगते की मी आपला लाडका शिष्य आनंदच्या प्रेमात पडली आहे व त्याच्या सोबत विवाह करू इच्छिते. भगवान बुद्ध म्हणतात धम्मात प्रवेश करतांना संसारिक जीवनाचा त्याग करायचा असतो. ती तरुणी बुद्धांना म्हणते की, माझे आनंदवर प्रेम जडले आहे. व तो मला खूप आवडतो. त्यावर भगवान बुद्ध म्हणतात की, तुला आनंदचे असे काय आवडले ? त्याचे नाक आवडले बुद्ध सांगतात नाक तर घाणीचे घर आहे. मग डोळे आवडले असे ती सांगते. बुद्ध सांगतात की डोळे हेतर अश्रुंचे घर आहे. कान आवडले, अरे ते तर मळाने भरलेले आहे. जन्म आहे म्हणजे त्यासोबत मृत्यू सुद्धा आहेच. माणसाचे बाह्य सौंदर्य नश्वर आहे. ते टिकाऊ नाही. ते कालांतराने कधीना कधी नष्ट होतेच. ती. तरुणी ह्या उपदेशाने धन्य झाली व आपण ह्या अज्ञानाने कसे वेडे झालो होतो हे तिच्या लक्षात आले व तिने आपले केस कापून धम्माच्या प्रचारास वाहून घेतले.
आज संपूर्ण विश्व् ह्या बाह्य सौंदर्याच्या आहारी गेले आहेत. आज किती तरी तरुण-तरुणी आपल्या बाह्य सौंदर्याला महत्व देऊन घमंडी झालेले आहेत. आणि जो तो सुंदर दिसण्यासाठी एका मागून एक स्पर्धा करू लागला आहे. ब्युटी पार्लर, स्पा यांचा गोरखधंदा आज तेजीत आहे. कितीही मेक अप केला तरीतो कालांतराने उतारतोच. आपणसुद्धा ह्या मेकअपला प्रोत्साहन देत असतो. सुंदर दिसतेस, सुंदर दिसतो, छान दिसतेस मला सुद्धा करायचे आहे. अशा प्रतिक्रिया देत असतो.
आज ह्या बाह्य सौदंर्याची गरज विश्वाला नाही आहे. बाह्य एव्हढे सौदंर्य करून सुद्धा माणूस सुखी नाही आहे तो दुःखी आहे. आज विश्वाला गरज भगवान बुद्धाच्या आंतरिक सौंदर्याची आहे. ज्याच्या कडे भगवान बुद्धा सारखे आंतरिक सौंदर्य आहे तो बाह्य सौंदर्याकडे पळणार नाही. तो आंतरिक सौंदर्य वाढवून जीवनात सुखी राहील. आज भगवान बुद्धाने दिलेले उपदेश 'अत्तदीपभव' हा अंगिकारण्याची गरज आहे. आंतरिक सौंदर्य वाढवून जीवनात सुखी राहण्याचा एकमेव मार्ग आहे. ना की बाह्य सौंदर्याकडे जाण्याचा. आज बाहय सौंदर्याला जास्त महत्व दिल्या जाते हे बघून बहूआंतरराष्ट्रीय कंपन्यांनी सौंदर्य प्रसाधनाचे उत्पादने मोठ्या प्रमाणात वाढविले आहे व आपण त्याला बळी पडतो आहे.
जर आपण आंतरिक सौंदर्यावर भर दिली तर आपला खर्च कमी होईल, बचत वाढेल. आपण चांगले माणूस होऊ. आपण सर्वाना हवे हवे से वाटू.आंतरिक सौंदर्य म्हणजे काय तर, दुसऱ्यांना मदत करणे, दुसऱ्यांच्या सुख दुःखात सहभागी होणे. आपली अडचण अशी आहे की, दुसरा सुखी असला की, आपल्याला फार दुःख होत. आपल्याला ते पहावल्या जातनाही. इथेच तर प्रॉब्लेम असतो. जो पर्यंत आपण आंतरिक सौंदर्य वाढविणार नाही तो पर्यंत हा त्रास आपल्याला होणार आहे. म्हणून आंतरिक सौंदर्य वाढविण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे आपण व इतर सर्वजण सुखी होऊ.एव्हडेच नाही तर संपूर्ण विश्वामध्ये शांतता नांदेल आणि हेच तर बुद्धाचे तत्वज्ञान आहे.
चला आज बौद्ध पौर्णिमे निमित्ताने आंतरिक सौंदर्य वाढविण्याचा संकल्प करूया. बौद्ध पौर्णिमेच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा...!
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या