काळाचे नवे आकलन
व्हावे एकदा दृष्टीला
अनादी अनंत धावणे पाहता यावे
आपल्या स्वप्नांची रिती ओंजळ
कधी भरु देत नाही तृष्णा
मन स्वतःच्या तुष्टीकरणाचे हेतूप्रत्यय
गोळा करून बांधत राहते मनोमन
मनोरे भौतिकाचे
फिरत राहते दाव्यास बांधलेल्या
सश्यासारखे असाह्य
ढूंडाळत राहते सुख
रानोरान भटकत कस्तुरीमृगासारखे
ही तृष्णा
जिचे मूळ स्वतःच्याच आत
खोदत जावे लागते
खोलवर करावी लागते नांगरनी
माती करावी लागती भूसभूसीत हृदयाची
या तप्त भूमीवर
एकदा तरी पडावा चिंतनाचा पाऊस
अंकुरावा आत्मविश्वास दुःखमुक्तीचा
ही मनाची मशागत
करावी लागते जीव लावून
जिला टाळत आलो आयुष्यभर
ते अशक्यच आहे असे वाटते
आपले अधिष्ठान डगमगते
तन बेफाम वाढलेल शेतात मावत नाही
तणावच टाकतो घेरुन
आपला गड राखून ठेवण्यासाठी
आपल्या स्मृतीचे नेक पहारेदार हवे
प्रज्ञेचा हवा लढावू सेनापती
शीलाची तटबंदीही हवी
स्वयंतेजाने आभामय व्हावी चरिया
आपल्या उठवळ नादानतेला
जाणता यावे सम्यक दृष्टीने
पुन्हा एकदा रसातळाला जाण्याआधी
देहातच लपले आहे मरण वार्धक्य
दुःखाची परंपरा
ज्याचा बोध होत नाही
चला बदलवीत जावू मनोरचना
या वस्ती वस्तीत उजेड पेरु
च्याचा आदी मध्य अंत कल्याणकारी आहे.
– सुभाष गडलिंग