मुंबई : देशभरात कोरोना विषाणू पसरवण्यास काँग्रेस जबाबदार आहे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर महाराष्ट्रातील राजरकारण तापले आहे. महाराष्ट्र काँग्रेसने मजुरांना स्थलांतर करण्यासाठी भाग पाडले, त्यासाठी मोफत तिकीटे त्यांना देण्यात आली, असा आरोपही नरेंद्र मोदींनी केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणेवर झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते संसदेत बोलत होते. यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही पंतप्रधान मोदींच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे.
पंतप्रधान मोदींच्या दीड तासांच्या भाषणाकडे खूप अपेक्षेने मी पाहत होते. कारण कोरोनाच्या महामारीतून आपण बाहेर पडत आहोत. राज्ये अडचणीत आहेत, कोविडच्या तिसरी लाट ओरसत आहे, चीनचा महत्त्वाचा मुद्दा आहे, नवीन नोकर्या निर्माण होत नाहीयेत या सगळ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे ते भाषण आम्ही ऐकत होतो. पंतप्रधान आपल्या महाराष्ट्राबद्दल जे बोलले त्याचे मला स्वत:ला वैयक्तिकपणे दु:ख वाटले. आपल्या राज्याबद्दल पंतप्रधान असे का बोलत आहेत याच्या मला वेदना झाल्या. राज्याने भाजपाला १८ खासदार निवडून दिले आहेत आणि मोदी पंतप्रधान असण्यामागे महाराष्ट्रातील मतदारांचाही मोठा वाटा आहे. त्या मतदारांचा आणि महाराष्ट्राचा अपमान पंतप्रधान मोदींनी कोविड सुपर स्प्रेडर म्हणून केला आहे. हे खूप धक्कादायक आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
एका पक्षाच्यावतीने पंतप्रधान बोलत होते हे पाहून मला दु:ख झाले. पंतप्रधानांचा मान सन्मान सगळ्यांनीच केला पाहिजे आणि त्यामध्ये पक्ष येत नाही. ते पद पक्षाचे नाही, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
गुजरात राज्यामधून १0३३, महाराष्ट्रातून ८१७ आणि पंजाबमधून ४00 ट्रेन कोरोनाकाळात चालवण्यात आल्या. ट्रेन महाराष्ट्र सरकार नाही तर केंद्र सरकार चालवते. आमच्याकडे ट्रेन नाही आम्ही एसटी देऊ शकतो. त्यामुळे पंतप्रधानांनी केलेल्या वक्तव्यामुळे मला वेदना होत आहेत. मी कुठल्या राज्याचा प्रचार करत नाही आहे. मला देशातल्या प्रत्येक राज्याबद्दल प्रेम आणि आदर आहे. रेल्वे मंत्री असताना पीयूष गोयल यांचे मी अनेकवेळा आभार मानले आहेत. पीयूष गोयल यांनी महाराष्ट्रासाठी १२५ र्शमिक स्पेशल ट्रेन देण्यासाठी तयार असल्याचे ट्विट केले होते. पीयूष गोयल महाराष्ट्राला मदत करु पाहत होते, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. पीयूष गोयल यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांनी ट्रेनबाबत चर्चा करत त्यांचे आभार मानले. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या पक्षातले लोकचं काहीतरी वेगळे बोलत आहेत आणि हे सातत्याने होत आहेत. खासदार हरीश द्विवेदी यांनीही र्शमिक ट्रेनबाबत सरकारचे आभार मानले. पंतप्रधानांनी पंजाब आणि उत्तर प्रदेश या दोनच राज्यांचा उल्लेख केला. महाराष्ट्रातील लोक इतर राज्यामध्ये अडकले असताना त्यांना परत आणल्यानंतर त्या राज्याचे मी आभार मानले. अनेक भाजपाच्या खासदारांनीही त्यांच्या राज्यातल्या लोकांसाठी महाराष्ट्राचे आभार मानले आहेत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या