Header Ads Widget

मुंडे भाऊ-बहीण पुन्हा एकदा आमने-सामने

    मुंबई : बीडच्या गेवराई तालुक्यात अवैधरित्या वाळू उपसा करून निर्माण झालेल्या खड्ड्यात चार मुलांचा मृत्यू झाला होता. दरम्यान यावरुन पुन्हा एकदा भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आमने-सामने आले आहेत. शाळकरी मुलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या वाळू माफियांवर ३0२ चा गुन्हा दाखल करा, अशी मागणी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे. तर याला उत्तर देत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर निशाणा साधला आहे.

    पंकजा मुंडे यांनी काय म्हटले?

    गेवराई तालुक्यात शहानजहानपूर येथे चार शाळकरी मुलांचा मृत्यू झाला आहे. वाळू माफियांनी वाळूचे उत्खनन केले आणि त्यानंतर खड्डे भरले नाहीत. पावसाळ्यानंतर तिथे पाणी साचले आणि मुलांना तो खड्डा न दिसल्याने त्यात बुडून मृत्यू झाला. यातील तीन मुलं शहाजहानपूर आणि एक तांदळवाडीमधील आहे. त्यांच्या आई, वडिलांच्या दु:खात मी सहभागी आहे. आमचे आमदार लक्ष्मण पवार तिथे जाऊन लक्ष देत आहेत. मी माफियाराजवर रोज बोलत असते. असे किती लोकांचे जीव जाणार आहेत. जिल्हाधिकार्‍यांनी तात्काळ कारवाई करुन गुन्हा दाखल केला पाहिजे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

    धनंजय मुंडेंचे उत्तर

    चार मुलांच्या मृत्यूबद्दल मी जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षकांना याबाबत विचारणा केली असून त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. तिथे खड्डा झाला, पाणी साचले आणि खेळायला गेले असता मुलांचा मृत्यू झाला हे खरे आहे. तो वाळूचा खड्ड अधिकृत होता की अनधिकृत होता? अधिकृत होता तर इतक्या खोलपयर्ंत करता येतो का? अनधिकृत होता तर कारवाई का झाली नाही? याची माहिती घेतली जात आहे, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली. दोषी असल्यास तहसीलदारांपासून पोलिसांपयर्ंत सर्वांवर कारवाई केली जाणार आहे सांगताना त्यांनी पंकजा मुंडेंच्या मागणीवर उत्तर दिले की, तुमच्या काळात वाळू माफियांवर ३0२ चा गुन्हा दाखल झाला असेल तर निश्‍चित करू, मात्र आता तो होत नाही. तसेच ३0२ खड्ड्यावर करायचा का? चौकशीअंती अनेक गोष्टी समोर येतील आणि त्यानंतर कारवाई करता येईल असेही ते म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या