Header Ads Widget

वीकेंड लॉकडाऊनचा सरकारचा विचार

    मुंबई : राज्यातली सध्याची परिस्थिती पाहाता टास्क फोर्सने लॉकडाऊनऐवजी ऑगमेंडेट रिस्ट्रीक्शन्स लागू करण्याचा प्रस्ताव दिला असून वीकेंड लॉकडाऊनचा सरकारचा विचार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून राज्यात वाढत असलेली रुग्णसंख्या आणि ओमिक्रॉनची भीती या पार्श्‍वभूमीवर पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू होणार का? अशी चर्चा सुरू झाली होती. या पार्श्‍वभूमीवर अजित पवार यांनी पुण्यात बोलताना मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत याविषयीचा अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले होते. यानंतर सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये राज्यातल्या कोरोना स्थितीवर चर्चा करण्यात आली. तसेच रुग्णवाढ आणि लसीकरणाचा वेग यावर देखील झालेल्या चर्चेनंतर राज्यात सध्या लॉकडाऊन लागू होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

    राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना याविषयी सविस्तर माहिती दिली. टास्क फोर्सने ऑगमेंटेड रिस्ट्रीक्शन्स असा शब्द वापरलाय. म्हणजे अशीच संख्या वाढत गेली, तर लॉकडाउनसारखा १00 टक्के बंद करण्याची आज तरी गरज नाही. पण अनावश्यक गोष्टींवर दररोजची रुग्णसंख्या तपासून बंधनं आणता येतील का? याविषयीचा निर्णय घेतला जाईल. या विषाणूला रोखण्यासाठी गर्दी थांबवणे गरजेचे आहे. त्यानुसार गर्दी करणार्‍या गोष्टींवर काही निर्बंध टाकण्यासाठी निर्णय घेतला जाईल. पण आजच त्यावर निर्बंध टाकले जातील, असे नाही. मुख्यमंत्र्यांना त्यावर माहिती दिली असून त्या त्या वेळी त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असं राजेश टोपे म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या