अमरावती : विकासकामांसाठी नियोजनानुसार निधी प्राप्त नसलेल्या संबंधित सर्व विभागांनी 15 जानेवारीपूर्वी मागणीचे प्रस्ताव सादर करावेत. या प्रक्रियेत विलंब होता कामा नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे दिले.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!जिल्हा नियोजन समितीच्या कामांचा आढावा घेण्यासाठी विविध विभागांची बैठक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे व सर्व विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.
जिल्हा नियोजन समितीकडून यंदा 300 कोटी निधीतून विविध विकासकामांचे नियोजन करण्यात आले आहे. ही कामे विहित मुदतीत पूर्ण होणे व निधी खर्ची पडणे आवश्यक आहे. त्यामुळे अद्यापही नियोजनानुसार निधीची मागणी न केलेल्या विभागांनी तत्काळ तसे पत्र द्यावे व पुढील कार्यवाही वेळेत होईल, यासाठी प्रयत्न करावेत. जो निधी खर्च होणार नाही, त्याबाबत तातडीने माहिती सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.
त्याचप्रमाणे, 2022-23 च्या आराखड्यासाठी नव्याने काही योजना- उपक्रम राबवावयाचे असतील, तर त्याचीही माहिती तत्काळ सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले. नाविन्यपूर्ण योजनेत अपेक्षित कामांचे प्रस्ताव सादर करण्याबाबत निर्देश श्रीमती भाकरे यांनी दिले.