Header Ads Widget

आदर्श ग्राम पुरस्कार

गावात महार ,कुणबी ,ढीवर
इत्यादी लोक आपापल्या मोहल्यात 
सोशल डिसटंगसिंगनुसार
हजारो वर्षांपासून राहतात 
अधूनमधून ठिणग्या उडाल्या गावात
पण सध्या बरं आहे !

गावात येताना दोन-तीन गेट आहेत
गेटच्या बाजूलाच
शासनाच्या तंटामुक्त , हागणदारीमुक्त
अशा पुरस्कारांचे मोठमोठे फलक आहेत.
अलीकडेच गावाला
शासनाचा आदर्श ग्राम पुरस्कार मिळाला
त्याचाही फलक आधीच्याच फलकांपाशी
सरपंचाने लावून घेतला .

काल गावी गेलो
नि त्या नव्या फलकापाशी
नुसताच घुटमळत राहिलो
सेल्फी काढून फेसबुकवर टाकावी
जातीवर नाहीतर फलकावर कविता लिहावी
तिला ' महासत्ता ' वगैरे असंच काहीसं
नाव द्यावं ; असं मनात आलं .

काळ किती वेगानं पुढं गेलाय
मोहल्ले अजूनही एकमेकांपासून दूरच
डोकं खाजवलं
परत परत घुटमळलो
नि वाऱ्याच्या वेगानं
माझ्या शहराकडे निघालो !
-------------------------------------------------------

                       प्रा .डॉ .सुरेश खोब्रागडे
                        लाखनी जि .भंडारा
                         भ्र.९३७३७११४३२
-------------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या