कोलकाता : माध्यमे हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून सरकारच्या चुका दाखवण्याची महत्त्वाची जबाबदारी या स्तंभावर असते, असे मानले जाते. माध्यमांचे हेच स्वातंत्र्य अबाधित राहावे आणि जाहिरातदारांच्या प्रभावाखाली ते गमावले जाऊ नये, यासाठी सरकारकडून प्रकाशित केल्या जाणार्या जाहिराती दैनिकांमध्ये छापल्या जातात, जेणेकरून त्यांना उत्पन्न मिळत राहावे आणि त्यांना जाहिरातदारांवर अवलंबून राहावे लागू नये. मात्र, सरकारकडून मिळणार्या याच जाहिरातींसाठी सरकारबद्दल चांगले आणि सकारात्मक लिहिण्याची अटच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एका पत्रकाराला घातली आहे. भर कार्यक्रमात ममता बॅनर्जी आणि या पत्रकारामधल्या संवादाचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.
- नेमके झाले काय?
ममता बॅनर्जी एका कार्यक्रमात बोलत असताना एका स्थानिक वृत्तपत्राच्या महिला पत्रकाराने त्यांना वृत्तपत्राला सरकारी जाहिराती मिळत नसल्याची तक्रार बोलून दाखवली. आम्ही गेल्या ११ वर्षांपासून आमचे वर्तमानपत्र चालवत आहोत. पण आमच्यासोबत अनेक छोटी वर्तमानपत्र आज आर्थिक अडचणीत आहेत. आम्हाला सरकारकडून जाहिराती मिळत नाहीत. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा विनंती करते की तुम्ही या गोष्टीमध्ये लक्ष घालावे, अशी विनंती या महिला पत्रकाराने ममता बॅनर्जींना केली.
दरम्यान, या प्रश्नावर ममता बॅनर्जी यांनी संबंधित महिला पत्रकाराला दिलेल्या उत्तराने सर्वच जण बुचकळ्यात पडले. ग्रामीण भागातील जी वृत्तपत्र सरकारच्या कामांविषयी चांगले लिहितील, त्यांना जाहिरातीतून नफा मिळेल. मी यासंदर्भात जिल्हाधिकार्यांना विशेषकरून सूचना देईन. कारण सरकार प्रत्येक वेळी प्रसिद्धीसाठी राज्य सरकारच्या संसाधनांचा वापर करत नाही, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
0 टिप्पण्या