आज दिनांक २८ नोव्हेंबर २०२१ ला अमरावती येथील सरोज चिञपट गृहामध्ये " जयंती " सिनेमा पाहण्याच्या निमित्ताने सहकुटूंब गेलो ,वास्तविकतः सिनेमाचा अद्याप पाहिजे तसा प्रसार आणि प्रचार न झाल्याने काही सामाजिक कार्यकर्त्यांना पुढाकार घेऊन सिनेमाची तिकीट विक्री करावी लागली ,त्या मेहनत घेणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार.
सकाळी ९ ते १२ चा चिञपट बघण्यासाठी ब-यापैकी उपस्थिती होती . सॕटेलाईटवरून प्रक्षेपण असल्याने सिनेमा अगदी वेळेवर सुरू झाला. सिनेमाचे कथानक आणि व्हीजन एकदम स्पष्ट असल्याने सिनेमा मनापासून आवडला. कथानकाची भाषा वैदर्भीय असल्याने प्रत्येकच संवाद काळजाला स्पर्श करणारा होता. कथानकामध्ये रेखा टिकाम नावाच्या आदिवासी घरकाम करणाऱ्या महिलेवर कुकरेजा नावाचा उद्योगपती बलात्कार करून खून करतो आणि तिला न्याय मागण्यासाठी विविध समाज घटकातून उभे होत असलेले आंदोलन साम,दाम,दंडाचा वापर करून चिरडण्याचा प्रयत्न होतो परंतु शेवटी त्या बाईला न्याय मिळतोच ,यावरून कुठलेही आंदोलन सर्वांनी एकत्र येऊन उभे केले तर निश्चित आंदोलन यशस्वी होते ,हा मेसेज सर्वांपर्यंत पोहचतो.दुसरा भाग असा की,आज महापुरूषांच्या नावावर समाजामध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न होतांना दिसून येतो.
याला आजची तरूण पिढी आणि वाचन नसलेले लोकं बळी पडतांना दिसून येते ,कथानकामध्ये सुध्दा सन्त्या ( रुतुराज वानखडे ) एक ओबीसी तरूण सुरूवातीला टपोरी ,भाईगिरी करणारा व एका आमदाराच्या ईशा-यावर काम करणारा ,स्वतः ला शिवाजीचा मावळा म्हणवून घेणारा पण शिवाजी महाराजांबद्दल चुकीचा इतिहास डोक्यात असणारा ,असाच दाखविलेला आहे परंतु अशोक माळी नावाचे शिक्षक आणि पल्लवी नावाची आंबेडकरी तरूणी ,त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलवून टाकते आणि त्याला एक यशस्वी माणूस बनविते ,यावरून महापुरूषांचे खरे विचार जर समाजामध्ये पोहचले तर निश्चितच आदर्श पिढी निर्माण होऊ शकते ,हा संदेश समाजापर्यंत पोहचतो. सोबतच पल्लवी ने साकारलेली भूमिका आंबेडकरी महिला व मुली किती करारी आणि आदर्शवत असतात हे सुध्दा दिसून येते. एकंदरीत चिञपटाचे कथानक उत्तम आणि प्रेरकच आहे. प्रत्येक कलाकार नामवंत नसला तरीही ,प्रत्येकाने आपली भूमिका साकारण्यासाठी कस लावल्याचेच दिसून येते.
चिञपट संपल्यानंतर लगेच चिञपटातील सर्वच कलाकार चिञपट गृहामध्ये आल्याने सर्वच कलाकारांना ,अभिनेत्यांना अगदी जवळून भेटता आले,त्यांचेसोबत फोटोसुध्दा काढता आले , मी मुख्य अभिनेता रुतुराज वानखडे ( सन्त्या ) व इतर कलाकारांना प्रत्यक्ष माझ्या पत्निसह भेटून अभिनंदन केले आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. एकंदरीत सर्वच कलाकार जमिनीवरील वाटले कारण ते सर्वच अगदी सामान्य कुटूंबातील असल्याचे जाणवले परंतु एक संदेश घेऊन हा चिञपट बनविल्याचे सर्व टिमने सांगितले.
मिञांनो, चिञपट निघाला ,निर्मात्याने गुंतवणूक केली ,परंतु प्रेक्षकच मिळाले नाही तर , निर्माते सामाजिक आशयाच्या चिञपटावर गुंतवणूकच करणार नाही ,म्हणून आपलीही थोडी जबाबदारी आहे,चिञपट चालला पाहिजे ,भक्कम गर्दीने चालला पाहिजे म्हणून आपण तर तिकिटे काढायचीच पण जास्तीचे तिकिटे खरेदी करून बाकिच्यांना पण वाटायची ,जेणेकरून प्रेक्षक मिळतील आणि परिवर्तना संदेश देखील विविध समाज घटकांपर्यंत पोहचेल....बस्स तुर्तास एवढेच.......!!
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या