अमरावती : राष्ट्रीय उर्जा संवर्धन सप्ताहानिमित्त नागरिकांमध्ये भविष्यात निर्माण होऊ घातलेल्या उर्जा संकटाबाबत जागृती करणे व अपारंपरिक उर्जा स्रोतांच्या वापराविषयी प्रबोधन करण्यासाठी “उर्जा संवर्धन रथा”ला महाउर्जा विभागीय कार्यालयाचे विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल्ल तायडे यांनी हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले. अपारंपरिक उर्जा स्रोतांचा वापर वाढविणे तसेच उर्जा संवर्धन करणे या बाबींना प्राधान्य देण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय उर्जा संवर्धन सप्ताह दिनांक 14 ते 20 डिसेंबर 2021 या दरम्यान साजरा करण्यात आला. जनजागृती करण्यासाठी उर्जा संवर्धन रथ शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांमध्ये मार्गस्थ करण्यात आला आहे.
महाउर्जा विभागीय कार्यालयातील लेखापाल अनिल राऊत, प्रकल्प अधिकारी सागर काळे, प्रसाद उपासने, अमित गजभिये, जगदीश नाखले व हर्षल काकडे यावेळी आदी उपस्थित होते.
भारत जगभरातील हरित वायू उत्सर्जन करणाऱ्या देशांपैकी प्रमुख देश गणला जातो. भारताने पॅरिस वैश्विक हवामान बदल करारनामा सन 2015 मधील आपल्या सक्रीय सहभागास अनुमती दर्शविली असून या अनुषंगाने आपला देश 17 शाश्वत विकास ध्येय राबवित आहेत.
नवीन व नवीकरणीय उर्जेचे तसेच ऊर्जा बचतीचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत असून ही काळाची गरज आहे. जवळपास 63 टक्के पेक्षा जास्त उर्जा निर्मिती ही औष्णिक उर्जा निर्मिती पद्धतीने केली जाते. पारंपरिक पद्धतीने उर्जा निर्माण करतांना त्यावेळेस पर्यावरणामध्ये ग्रीन हाऊस गॅसेस सोडले जातात. या वायूंचा पर्यावरणावर विपरित परिणाम होत असून जागतिक उष्णतामान दिवसेंदिवस वाढत आहे. पारंपरिक उर्जा निर्मितीचे स्त्रोत सिमीत असल्याने सद्यस्थितीत नित्यनूतनशील उर्जाशिवाय पर्याय नसून ही प्रदूषण विरहित आहे. उर्जा संवर्धन करण्याच्या दृष्टीने नागरिकांना “राष्ट्रीय उर्जा संवर्धनाचे महत्त्वाबाबत महाउर्जा विभागीय कार्यालयामार्फत जनजागृती करण्यात येत आहे.