Header Ads Widget

"शाश्वत उजेडाच्या दिशेने जाणारी अरुण विघ्नेचीं कविता !"

    अरुण विघ्ने हे नाव कवितेच्या प्रांतात गेल्या तिन दशकापासून परिचित आहे.'पक्षी' (२०००), 'वादळातील दीपस्तंभ'(२०१९), 'जागल'(२०२०), हे त्यांचे प्रकाशीत काव्यसंग्रह. नव्यानेच प्रकाशीत झालेला 'मी उजेडाच्या दिशेने निघालो' स्वागतार्ह चौथा काव्यसंग्रह,ज्याला डॉ भूषण रामटेके यांची सुरेख प्रस्तावना आणि अरविंद शेलार यांचे आकर्षक मुखपृष्ठ व डॉ प्रमाेद मुनघाटे यांनी पाठराखण केली आहे.सदर काव्यसंग्रहात कवी विघ्ने यांनी मुक्तछंद, अष्टाक्षरी,अभंग ,गझल असे प्रकार हाताळलेले आहेत. सर्व साधारणपणे कवितांचे वर्गीकरण करावयाचे झाल्यास बाबासाहेबांच्या प्रेरणेतून उदयास आलेली कविता, कविच्या वैयक्तीक जीवनावरील कविता, कोराेना वरील कोरोना परिस्थतीवर आधारीत कविता, नातेसंबंधीत जीवन उलगडा करणारी कविता, बळीराजाच्या विस्कटीत दैनदीन व्यवस्थेवरील कविता वाचावयास मीळतात. अरुण विघ्ने सरांची कविता वैयक्तीकतेतून सामाजिकतेकडे वळते आणि विस्तृत होत जाते . अखेर ती स्वतः पुरती न राहता प्रातिनिधिक होते. अंधार म्हणजे काळोख, दुखाचे सावट अशा अंधार कोठडीतून आम्ही बाबासाहेबांच्या प्रखर तेजाने उजळल्या गेलोत आणि तुम्हीं दाखविलेल्या मार्गावरुन मी उजेडाच्या दिशेने निघालो.

    "लाखो खाचखळग्यातून चालतांना तुष्णेच्या कोटी कोटी दगडांना ठेचाळून रक्तबंबाळ होवून थकलेली माझी पावलं आता तुझाच अष्टांग मार्ग चोखळणार आहेत आणि बोधिवृक्षाखाली विसावणार आहेत कायमची" (पानं ३६) शोषीत कणवेची जाणीव आणि बुध्दाच्या मार्गाने मीळालेली मुक्ती, त्यामुळेच आम्ही बोधिवृक्षाच्या छायेत कायम विसावणार आहोत. आंबेडकरी मानवी मुल्ये आणि बुध्दाच्या प्रभुत्त्व तत्वज्ञानावर ही कविता उभी आहे कवितेत शब्दा- शब्दातून व्यवस्थेने दिलेल्या अमाणुष वर्तनाचाी जाणीव होत राहते या कवितेचे उदिष्ट म्हणजे निरंतर आंबेडकरी मुल्यांचा उद्घोष करीत राहणे हाेय, वंचीत समाजाचे देैन्य, दु:ख कवितेतून मांडणे गर्भस्थ आहे.

    "तुमच्या बंडानेच आज स्त्री घेतेय सर्वच क्षेत्रात गगनचुंबी भरारी तुमचा वारसा चालवीत बाबासाहेबांनीही त्याला कायद्याने बळकटी दिली." (पांन २१) कवी म्हणताे ज्योतीबांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला आणि बाबासाहेबांनी कायद्याची बळकटी दिली म्हणुनच वर्तमानातली स्त्री सर्व क्षेत्रात गगनचुंबी भरारी घेण्यात सिध्द झाली. तसेच खंतही व्यक्त केली , 'आम्ही मात्र कृतघ्न होवू नयेत तुमंच्या परिवर्तनाशी.' दिव्यांनीच ठरवाव या कवितेत कवी म्हणतात " दिव्यानिंच ठरवावं आपापलं, कुठेकुठे पेटुन प्रकाशायचं " तस बघीतले तर दिव्यानां भेदभाव नसतोच जिथे जिथे प्रकाशमान होणार आणि तेल संपल्यावर विझणार सुध्दा. तसेच 'गर्दी अशी पांगायला नको होती' या मुक्तकातून धुरीणांच्या कर्त्तव्य कुचराईमूळे उत्पन्न हाेणाऱ्या विषमतेच्या असमतोल व्यवस्थेवर आसुड ओढल्याचे दिसून येते.

    "सोसलेल्या वेदनांचा हुंकार ऐकतो मी
    न केलेल्या गुन्ह्यांचा भार वाहतो मी" (पानं १०७)
    "तू घाल काटेरी तारेचे कुंपण रस्त्यावर
    मी स्वार होताे उंचावरुन वाहणाऱ्या वाऱ्यावर " (पानं५१)

    असे सोसलेल्या वेदनांचे हुंकार त्यांनीं वैयक्तीक जीवनासी निगडीत कवितामधुन चित्तारलेले पहावयास मीळते. 'मी जन्मल्यापासून', 'प्रकाश पर्वाचा साक्षीदार' 'आयुष्याचा प्रवास ', 'माया बापाले सांगजो','नेक कमाई ' आणि 'अंधार माजला ' ह्या कवितांमधुन कवींच्या वैयक्तीक जीवनाचा साक्षात्कार होतो.

    "स्थिरावलेली पावलं, सुनसान वाटा,
    मशिनची थांबलेली चाकं,
    पोटात उसळलेल्या भुकेचा आगडोंब,
    कोरोनाची महमारी "

    जगावर कोराेनाचे संकट आले, प्रजेला सडो की पडाे करुन सोडले, अन्न अन्नांन दशा झाली स्थिरावलेली पावलं रुतून बसली, सुनसान रस्ते झाले, चालत्या चाकाला उट लागली ,मजुर कामगार बेकार झालेत, एवढे बेहाल एका कोरोनाने केले.कोराेनाचे जीवंत चित्रन 'मुके शब्द' 'मृत्युचा जाहीरनामा , 'कोरोना आणि अस्पृश्यता ' 'दररोज ब्रेकींग न्युज येत आहे'. 'कामास वाव नाही'. या सारख्या कवितामधुन उभे केले आहेत. "निरंतर असंच चालत राहील तर", मग शोधावा लागतो त्याला आपल्याच बेैलाचा कासारा+झाड किंवा जहर,नाही तर विहीर.परत एकदा आयुष्याचा हिशेब शुन्यावर आणण्यासाठी ". (पानं १११)

    हे दु:ख आहे बळीराजाचे सर्व तरणोपाय संपल्यानंतर तो मृत्युला जवळ करतो .हे त्याच टोकाच पाऊल गैर असल तरी वास्तव नाकारता येत नाही . असमानी आणि सुलतानी व्यवस्थेत तो पार भरडला जाताे , कर्जात‌ डुबतो. त्याने

    रात्रीच्या गर्भात उज्वल पहाटेची पाहिलेली स्वप्न काळाबरोबर विरान होतात आणि आयुष्याचं गणीतच बिघडून जाते. पुनः तेच बैल ताेच कासरा आणि तेच अवजार हातात असते.'गणित बळीच्या आयुष्यातलं' कोंडलेला श्वास आहे . शेतात राबणाऱ्या. शेतातल्या मातीत मी. या सारख्या कवितातून बळीचीं व्यथा चिंब पाझरतानां दिसते .
    "कडाक्याच्या थंडीतली उब असतो, पावसातली छत्री असतो,कसाही असो ,कुणाचाही असो कोणत्याही परिस्थीतीत मनस्थितीत बाप हा बापच असतो". (पानं२५)

    बापाच्या महतीची साक्ष पटवुन देणाऱ्या ह्या ओळी.अश्याच बाप आई , 'माझ्या जन्मदात्यानों '. ' रान पाखराची माय '. 'माय सुखाची सावली', अशा कवितामधून नात्याची गुंफण विणलेली आढळून येते. माणुसकीच्या धाग्याने फाटलेली नाती आणि दुभंगलेली मने अविरत शिवणारा कवी नात्याचा गोडवा जपताना दिसतो आणि दुसरीकडे माणसांच्या अमाणविय कृत्याचा धिक्कार करतो, ताशेरे ओढतो ."माझ्याच माणसांनी धोक्यात वार केले छाती असून उघडी पाठीत वार केले ".(पानं १२५)

    संग्रहातील दिड दशक गझला मधुन कामगाराच्या व्यथा 'लाळघोटू वृत्ती' 'अंतरीची वेदना,'अन्याय', 'छूपेवार' 'प्रेम','बंधुभाव', 'उणेपणा' 'बाणा','वृक्षारोपण','वादसंवाद', यासारखे विषय हाताळून गझलेला समृद्ध केले.तसेच रोजच बलात्कारासारख्या घटना घडल्याचे आपण वाचत असतो, ऐकत असतो,त्यातून बचावासाठी 'पोरी जरा ऐक माझं या कवितेतून मुलीनां उपदेश केला आणि' काय घेवून जाशील या कवितेतून अवयव दानाचा मोलाचा संदेश दिला. आपली सामाजिक बांधीलकी जपली

    "बाबासाहेब ! तुम्हीच आमच्याच माणूस पेरला तुम्हीच आमच्यातला निखारा हेरला तुम्हीच दिला बुध्द आणि धम्म तुम्हीच झालात अंधाराच्या प्रकाशवाटा तुम्हीच दिलीत लेखणी आमच्या हातात. तुम्हीच शिकवल उडायला आकाशात " अशी ही बाबासाहेबांच्या प्रेरणेतून प्रसवलेली कवी अरुण विघ्नेचीं कविता सामजिक जाणीवेमूळे आशयघन झाली आहे. त्यांच्या पुढील साहित्यीक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !

    परिक्षण-मारुती पुनसे
    साईनगर, दर्यापुर
    कवितासंग्रह : 'मी उजेडाच्या दिशेने निघालो'
    कवी : अरुण हरिभाऊ विघ्ने
    प्रकाशक : मध्यमा प्रकाशन
    किंमत : २२०₹
-----

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या