अमरावती : नकारात्मकता, भय, निराशा दूर करून समाजमनात सकारात्मकता पेरण्याचे, तसेच सुखी व समृद्ध समाजनिर्मितीसाठी सतत प्रयत्न करण्याचे काम जनसंवाद क्षेत्राद्वारे व्हावे, असे प्रतिपादन भारतीय जनसंचार संस्थेचे क्षेत्रीय निदेशक डॉ. अनिल सौमित्र यांनी आज येथे केले.
‘पब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडिया’चे (पीआरसीआय) अमरावती चॅप्टर आणि भारतीय जनसंचार संस्थेच्या (आयआयएमसी) संयुक्त विद्यमाने ‘वर्ल्ड कम्युनिकेटर्स डे’निमित्त आयोजित विशेष कार्यक्रम ‘आयआयएमसी’च्या सभागृहात झाला, त्यावेळी ते बोलत होते. ‘पीआरसीआय’चे विदर्भ समितीप्रमुख राजेश बोबडे, अमरावती चॅप्टरचे अध्यक्ष हर्षवर्धन पवार, उपाध्यक्ष डॉ. विलास नांदुरकर, सचिव फुलसिंह राठोड, सहसचिव गौरव इंगळे, कोषाध्यक्ष भूषण पुसतकर, अपर्णा यावलकर, प्रा. अनिल जाधव, प्रा. विनय सोनुले, प्रा. संध्या झा, संजय पाखोडे, सागर राणे, राजश्री चोरपगार, शुभम बायस्कार, जयंत सोनोने, भावना शर्मा आदी यावेळी उपस्थित होते.
डॉ. सौमित्र म्हणाले की, नागरीकरण, बदलते तंत्रज्ञान यामुळे जनसंवादात विविध बदल घडवले आहेत. नव्या साधनांचा वापर सकारात्मकता जोपासण्यासाठी झाला पाहिजे. दुर्देवाने अनेकदा विनाशक बाबींकडेही करमणूक म्हणून पाहिले जाते. अशावेळी समाजमनात विवेक जागृत ठेवणे, विधायकता व सकारात्मकतेचा दीप तेवत ठेवणे आणि समस्त समाज सुखी, समृद्ध होण्यासाठी प्रयत्नरत राहणे ही जबाबदारी जनसंवाद क्षेत्राने पार पाडली पाहिजे. तसा संकल्प आजच्या दिनानिमित्त करण्याचे आवाहन त्यांनी केले.
श्री. पवार यांनी प्रास्ताविक केले. डॉ. नांदुरकर यांनी आभार मानले. श्री. इंगळे यांनी सूत्रसंचालन केले.
—–