मुंबई : कोविड महामारीच्या संकटाने दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना मदत म्हणून प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याप्रमाणे अशा बालकांच्या खात्यात ५ लाख रुपये जमा करण्यात येत आहेत. त्यासाठी शासनाकडून जिल्ह्यांना निधी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असे राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री ऍड यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!कोविड महामारीमुळे गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यातील शेकडो बालके आई वडिलांचे छत्र हरपल्याने अनाथ झाली आहेत. अशा बालकांच्या भविष्यासाठी त्यांच्या शिक्षणासाठी एकूणच त्यांच्या संरक्षणासाठी काही आर्थिक तरतूद करणे गरजेचे होते, यासाठी महिला बाल विकास विभागाच्यावतीने महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. या पाठपुराव्यानंतर कोविड महामारीत अनाथ झालेल्या बालकांच्या खात्यामध्ये प्रत्येकी ५ लाख रुपये जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
या निर्णयानुसार नुकतेच राज्यातील ३०६ अनाथ बालकांच्या खात्यात सुमारे १५ कोटी ३० लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. तसेच राज्यातील अनाथ बालकांची एकूण संख्या सुमारे सहाशे इतकी असून उर्वरित बालकांच्या खात्यातही लवकरच पैसे जमा करण्यात येतील, असे श्रीमती ठाकूर यांनी सांगितले. राज्यातील अमरावती, गोंदिया, चंद्रपूर, सांगली, वर्धा, सोलापूर रायगड अलिबाग, रत्नागिरी, नाशिक, आणि पुणे, नागपूर अशा विविध २४ जिल्ह्यांमधील बालकांच्या खात्यात पैसे वर्ग झाल्याचा तपशील विभागाकडे नुकताच प्राप्त झाला आहे.
या निर्णयामुळे या बालकांना काही प्रमाणात आर्थिक सुरक्षितता देता आली असून विविध योजनांच्या माध्यमातून या बालकांच्या शिक्षण आणि संगोपनासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिली.