• Fri. Jun 9th, 2023

गणपतराव देशमुख यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

    सांगोला :सांगोलाचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या पार्थिवावर शेतकरी सहकारी सूत गिरणीच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अमर रहे, अमर रहे, आबासाहेब अमर रहेच्या घोषणा देण्यात आल्या. शेकडो कार्यकर्त्यांना दु:ख अनावर झाले. दुपारी पावणेतीन वाजता ज्येष्ठ मुलगा पोपटराव देशमुख मुखाग्नी दिला. याप्रसंगी चंद्रकांत देशमुख यांच्यासह कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. राज्यातील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री भाई गणपतराव देशमुख यांचे शुक्रवारी रात्री उशिरा निधन झाले. सोलापुरातील अश्‍विनी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. महाराष्ट्राच्या राजकारणात गणपतराव देशमुख कायमच सर्वांच्या स्मरणात राहतील.

    भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनाचे वृत्त समजतात संपूर्ण सांगोला तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात आली. शनिवारी सकाळी सोलापूरहून त्यांचे पार्थिव सांगोला तालुक्?यात आणण्यात आले. दरम्यान पंढरपूर – सांगोला रस्त्यावर त्यांच्या दर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. त्यांचे मोठे मोठे पोस्टर्स लावण्यात आले.

    ज्येष्ठ माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे दुष्काळग्रस्त भागाच्या सर्वांगीण विकासासाठी खूप मोठे काम आहे. नव्या पिढीला त्याच्या कार्याची माहिती व्हावी, त्यांचे लोकाभिमुख कार्याचा गौरव, आठवण राहण्यासाठी राज्यशासनाने गणपतराव देशमुख यांच्या नावाने दुष्काळी भागासाठी मोठी विधायक योजना सुरू करावी अशी मागणी शेकाप नेते आमदार जयंत पाटील यांनी र्शद्धांजली सभेत केली.

    राजकारणातील एक साधे व सात्विक व्यक्तिमत्व हरपले – मुख्यमंत्री

    शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख शेतकरी कामगार पक्षाचे ते ज्येष्ठ नेते होते. राजकारणातील एक साधे आणि सात्विक व्यक्तिमत्व हरपले, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगोलाचे माजी आमदार आणि ज्येष्ठ शेकाप नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. आबासाहेबांनी राजकारणामध्ये एक आदर्श निर्माण केला, जो वषार्नुवर्षे एक मापदंड म्हणून राजकीय विश्‍वात राहील, असेही मुख्यमंत्री म्हणाले. आज भारतातील राजकारण कशा पद्धतीनं सुरू आहे, हे वेगळे सांगायला नको. आदर्शवादी असणारी पक्षनिष्ठा आणि विचाराधारा या गोष्टी तर राजकारणात दुर्मिळ होऊन गेल्या आहेत. मागील काही वर्षांपासून लोकप्रतिनिधी होण्याची जिकडे खात्री, तिकडे जाण्याचा पायंडाचं पडला आहे. मागील काही निवडणुकांपासून याचं भारतीयांना जवळून दर्शन होऊ लागलं आहे. पण अशा काळात गणपतराव देशमुख यांनी विचारधारा आणि पक्षनिष्ठेला तडा न देता आदर्शवादी परंपरेला जपलं. म्हणून त्यांची कधी आमदारकी गेली नाही. उलट मोदी लाटेतही ते आमदार होऊन महाराष्ट्राच्या विधानसभेत गेले होते.

    चार पिढय़ांच्या मतदारांशी घट्ट नाळ जुळलेला नेता गमावला -शरद पवार

    गणपतराव यांच्या निधनामुळे जनसामान्यांचे आणि कार्यकर्त्यांचे निस्सीम प्रेम लाभलेला स्वच्छ प्रतिमेचा, ध्येयवादी नेता आज आपण गमावला आहे, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.
    कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर व उपेक्षितांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाचे वृत्त दु:खद आणि क्लेशदायक आहे. महाराष्ट्राच्या चार पिढ्यांच्या मतदारांशी घट्ट नाळ जुळलेला गणपतरावांसारखा लोकप्रतिनिधी खरंच विरळा म्हणावा लागेल.लोकाभिमुख राजकारणाची कास धरत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून ११ वेळा निवडून येण्याची किमया गणपतरावांनी साधली.

    त्यांच्या निधनामुळे जनसामान्यांचे आणि कार्यकर्त्यांचे निस्सीम प्रेम लाभलेला स्वच्छ प्रतिमेचा, ध्येयवादी नेता आज आपण गमावला आहे, अशा भावना शरद पवार यांनी व्यक्त केल्या.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *