नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हणजेच सीबीएसईने शुक्रवारी दुपारी २ वाजता १२ वीचा निकाल जाहीर केला. निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करावेत असे आदेश यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर या आठवड्यात सीबीएसईने एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली होती. ज्यामध्ये याच आठवड्यात निकाल जाहीर होणार असल्याचे सांगण्यात आले. यावर्षी कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेदरम्यान मंडळाने दहावी व बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शुक्रवारी सीबीएसई बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. पण, यावर्षी टॉपर्सची गुणवत्ता यादी जाहीर झालेली नाही. यावेळी एकूण १२ लाख ९६ हजार ३१८ विद्यार्थी १२ वीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. केंद्रीय विद्यालयातील १00 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यावेळीच्या १२ वीच्या निकालामध्ये १ लाख ५0 हजार १५२ विद्यार्थ्यांनी ९0 ते ९५ टक्क्यांपर्यंत गुण मिळवले आहेत. तर ७0 हजार ४ विद्यार्थी ९५ टक्क्यांहून अधिक गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्तीर्णतेची टक्केवारी बरीच सुधारली आहे. २0२0 मध्ये, ८८.७८ टक्के विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती.
सीबीएसई १२ वीच्या निकालावर असमाधानी असलेले विद्यार्थी पर्यायी परीक्षा देऊ शकतात. शिक्षण मंडळानेही पर्यायी परीक्षेच्या तारखा १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत निश्चित केल्या आहेत. सीबीएसई १२वीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला आहे, लवकरच पर्यायी परीक्षांच्या नोंदणी अर्जासाठी वेबसाईटवर माहिती देण्यात येणार आहे.