तळेगाव (शा.पंत) : गोपाल चिकाटेनजीक असलेल्या चिस्तूर या गावाजवळ अमरावतीवरून नागपूरकडे जात असलेल्या कारचे नियंत्रण सुटल्याने महामार्ग क्र. ६ वरील नदीच्या दरीत कार कोसळून चालकासह तीन प्रवासी ठार झाल्याची घटना सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.
सविस्तर वृत्त असे की, शुक्रवार, ३0 जुलै २0२१ च्या पहाटेच्या दरम्यान तळेगावच्या चिस्तूर गावाजवळ कार क्र. एम.एच. ३0 पी ३२१४ स्विफ्ट डिझायर गाडीचा भीषण अपघात झाला आहे. ज्यामध्ये तिघे जागीच ठार तर एकजण आश्चर्यकारक वाचला आहे. मृतांमध्ये अमित गोयते (वय ३२) रा. बडनेरा, शुभम गारोडे (वय २५) रा. अमरावती, आशिष माटे रा. राजुरा, जि. अमरावती हे तिघे जागीच ठार झाले असून, तर शुभम भोयर हा सुखरूप वाचला आहे. हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे. एकाचा मृतदेह हा झाडावर अडकला होता तर दुसरा गाडीत अडकला होता तर तिसरा मृतदेह बाजूला पडून होता.पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला असावा, असे सांगण्यात आले आहे. मोठे पळसाचे झाड तोडून ही गाडी उडून बाजूला फेकली असावी, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक पवन भांबूरकर, जमादार राजेश साहू, सुधीर डांगे, श्याम गहाट, राहुल अमोने, अनिल चिलघर, देवेंद्र गुजर, विजय उईके, रमेश परबत यांनी मोठी कसरत करून मृतदेहांना उत्तरीय तपासणीसाठी पाठवले. यामध्ये जळगाव येथील युवक कादर खान यांनी व बाकीच्या युवकांनी पोलिसांना मोठी मदत केली.
भरधाव कार दरीत कोसळून तिघे ठार
Contents hide