तिवसा : अमरावती- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या तिवसा बसस्थानक जवळील आशिर्वाद वाईन बारसमोर शनिवारी (२६ जून) रात्री १0.१५ वाजता शिवसेनेचे तिवसा शहर प्रमुख अमोल पाटील यांची डोळ्यात मिरचीपूड टाकून त्याच्या डोक्यावर धारदार शस्त्रांनी वार करून निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली असून, तणावाची स्थिती आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. अमोल र्जनादन पाटील (वय ३८, रा. तिवसा) असे मृतकाचे नाव असून, तो शिवसेना शहर प्रमुख होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,शनिवार, २६ जून रोजी रात्री अमोल पाटील हा आपल्या तिवसा येथील एका मित्रासोबत आशीर्वाद बारमध्ये आला होता. आरोपींनी अमोल पाटील यांच्या हत्येचा पूर्वीच कट रचला होता. आरोपींनी अमोलच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करीत त्याला जागीच ठार करून पोबारा केला. घटनेची तिवसा पोलिसांना माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रिता उईके आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी तपास चक्र फिरवित काही तासातच चार आरोपींना वर्धा जिल्ह्यातील तळेगाव श्यामजीपंत येथून अटक केली. तर एक आरोपी पसार असल्याची माहिती पोलिस निरीक्षण रिता उईके यांनी दिली. अटक केलेल्या आरोपीमध्ये संदीप रामदास ढोबाळे (वय ४२), प्रवीण रामदास ढोबाळे, प्रवीण उर्फ अविनाश एकनाथ पांडे (वय ३0), रूपेश घागरे (वय २२) राहणार सर्व तिवसा तर एक जण पसार आहेत, आरोपीविरुद्ध ३0२, १४३, १४७, १४८, १४९, १२0 (ब), ३४ नुसार गुन्हे दाखल केले आहे. सदर घटना पूर्वनियोजित असून, खून करताना यातील आरोपी यांनी आशीर्वाद बारमधिल सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले होते. रात्रीच घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी जितेंद्र जाधव यांनी धाव घेत घटनेविषयी माहिती घेतली. अमोल पाटील यांची हत्या जुन्या वैयमनस्यातून झाली असल्याचे समजते
शिवसेना तिवसा शहर प्रमुखाची निर्घृण हत्या
Contents hide