संमेलनाध्यक्ष डॉ. राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम!
Contents hide
_____________________
अमरावती : आगामी अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संमेलन वाशिमचे संमेलनाध्यक्ष व तांडा सुधार समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष, प्रसिद्ध विचारवंत प्राचार्य डॉ. प्रकाश राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त तालुका अध्यक्ष संजय आडे यांच्या नेतृत्वात तालुक्यातील विविध तांड्यात वृक्षारोपण करण्यात आले. तांडा सुधार समितीच्या वतीने राठोड यांचा वाढदिवस स्वयंरोजगार दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा करण्यात यावा असे आवाहन नामा बंजारा यांनी केले होते. त्या अनुषंगाने दारव्हा, पुसद, उमरखेड, वाशिम,मालेगाव, नागपूर,चाळीसगाव, चंद्रपूर, उमरेड,औंढा नागनाथ, वाशिम, अनसिंग अशा विविध जिल्ह्यात वृक्षारोपण करून तरुणांना स्वयंरोजगारा विषयी माहिती देण्यात आली. डॉ. राठोड हे आगामी गोर बंजारा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असून नोंदणीकृत तांडा सुधार समिती या संघटनेचेही राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. बुधवार दिनांक १६ जून २०२१ रोजी नामा बंजारा यांच्या अध्यक्षतेखाली व यूनिसेफचे भूतपूर्व प्रशिक्षक श्रीपत राठोड यांच्या मार्गदर्शनाने आभासी पद्धतीने स्वयंरोजगार दिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी श्रीपत राठोड यांनी शरद पवार ग्रामस्वराज्य योजनेची माहिती दिली. या योजने अंतर्गत चार प्रकारच्या योजना राबविण्यात येणार असून शासकीय अनुदान मिळणार आहे. या योजनेचा लाभ गाव, वस्ती, तांडा, बेडा, पाड्यावरच्या नागरिकांनी घ्यावा असे आवाहन श्रीपत राठोड यांनी केले. नामा बंजारा यांनी आपल्या मनोगतात तांड्यातून हद्दपार होत जाणाऱ्या शाळा, आरक्षणावर आलेले धोके लक्षात आणून देऊन आरक्षणासाठी लढा पुकारण्याची गरज असून येत्या 26 जूनच्या आंदोलनासाठी तांडा सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी व बंजारा सह सगळ्याच मागासवर्गीयांनी आरक्षण हक्क कृती समितीच्या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. सकाळी नागपूरच्या महात्मा फुले विद्यालयात शिक्षकांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आले तर आभासी सभेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. ताराचंद चव्हाण यांनी केले. सूत्र संचालनाची जबाबदारी दत्तराव पवार यांनी तर आभार प्रा. प्रकाश जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या यधस्वीतेसाठी मोहन जाधव, पृथ्वीराज चव्हाण, दिनेश पवार, प्रा.डॉ.सुभाष जाधव, इंदल पवार, सरदार राठोड, अनिल राठोड पुसद, संजय आडे पुसद, मनोहर राठोड, अनिल जाधव यांनी परिश्रम घेतले.