अमरावती:वनसंवर्धनासाठी विविध योजना राबविताना विविध भागांची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन पर्यटनस्नेही प्रकल्पही राबवावेत, असे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.वन विभागाच्या जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत, तसेच विभागांतर्गत केलेल्या विविध कामांचा आढावा पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंतराव वानखडे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, अपर मुख्य वनसंरक्षक ज्योती बॅनर्जी व वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, वनांचे संवर्धन करण्यासाठी आवश्यक तिथे पुनर्वनिकरणाची कामे प्रभावीपणे राबवावीत. वनपर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटनस्नेही उपक्रमांची अंमलबजावणी करावी. विविध भागांची स्थानिक वैशिष्ट्ये लक्षात घेऊन त्यानुसार प्रकल्प राबवावेत. जिल्ह्यात केकतपूर येथे स्थलांतरित पक्ष्यांची वर्दळ असते. पक्षी अभयारण्यासारखे उपक्रम तिथे राबवता येणे शक्य आहे. यासाठी पक्षीप्रेमींची बैठक घेऊन त्यांच्या सूचना विचारात घ्याव्यात. आवश्यक तिथे वॉचटॉवर्स उभारावेत, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात पांदणरस्त्यांसाठी विशेष मॉडेल राबविण्यात येत आहे. ठिकठिकाणी पांदणरस्त्यांची अनेक कामे सुरु आहेत. शेतकरी बांधवांना शेतापयर्ंत पोहोचण्यासाठी व शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी पांदणरस्ते चांगले असणे आवश्यक आहे. त्यामुळे या कामांसाठी वनविभागाने आवश्यक परवानगी आदी प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. पांदणरस्त्याच्या कामात कुठेही अडथळा येऊ नये, असे निर्देशही त्यांनी दिले.वन विभागाकडून निकृष्ट वनांच्या पुनर्वनिकरण, वनपर्यटन व पर्यटनस्नेही पर्यावरण, जल व मृद जलसंधारण कामे, मध्यवर्ती रोपमळा, वनातील इमारती दुरुस्ती, वन संरक्षणाची कामे, वनातील मार्ग व पूल, आगीपासून वनांचे संरक्षण आदी विविध योजना राबविल्या जातात. त्यासाठी जिल्हा योजनेतून १८ कोटी २५ लाख व कॅम्पा योजनेतून सुमारे ३ कोटी निधीची तरतूद करण्यात आली, अशी माहिती श्रीमती बॅनर्जी यांनी सादरीकरणादरम्यान दिली.
वनसंवर्धन करताना पर्यटनस्नेही प्रकल्प राबवा – पालकमंत्री
Contents hide