बारामती : महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना आम्ही काही मुद्यांवर एकत्र आलो. त्याचवेळी किमान समान कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. मात्र सरकार चालवत असताना काही ना काही प्रश्न निर्माण होतात. या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी एक यंत्रणा स्थापन करण्यात आली आहे. कोणत्याही महत्वाच्या धोरणात्मक प्रश्नासाठी हे सर्व सहकारी एकत्र बसतात आणि त्यावर निर्णय घेत असतात. त्यामुळे हे सरकार अत्यंत व्यवस्थित चालले आहे. हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल याबद्दल शंका नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.
बारामती येथील गोविंदबाग या निवासस्थानी रविवारी (दि.२७) पवार माध्यामांशी बोलत होते. अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व काही आलबेल असल्याचे दिसत नाही. यावर पवार म्हणाले, महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना आम्ही काही मुद्यांवर एकत्र आलो. त्यावेळी किमान समान कार्यक्रम तयार करण्यात आला होता. सरकार चालवत असताना काही ना काही प्रश्न निर्माण होतात. या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी एक यंत्रणा स्थापन करण्यात आली आहे. यात काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, तर राष्ट्रवादीकडून अजित पवार आणि जयंत पाटील हे समन्वय साधून काम करत आहेत. सरकारमध्ये काही अडचण आल्यास धोरणात्मक निर्णय हे सहा जण घेत असतात. त्यामुळे हे सरकार पाच वर्ष चालेल, याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही, असा विश्वास यावेळी व्यक्त केला आहे.
राजकारणात प्रत्येक पक्ष आपआपली संघटनात्मक ताकद वाढवत असतो. यामध्ये काही गैर नाही. शिवसेना असो, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी असो सर्व पक्षांना संघटना वाढवण्याचा पूर्ण अधिकार असून याबद्दल आमच्यात सामंजस्य असून कुठेही मतभेद नसल्याचे पवारांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
रिझर्व बँकेने आमदार, खासदार आणि मंत्र्यांना आता सहकारी बँकेच्या निवडीवर निर्बंध आणले आहेत या मुद्दय़ावर बोलताना. पवार म्हणाले, भारतीय रिझर्व बँक ही अर्थ विषयक संस्थांवर नियंत्रण ठेवणारी संस्था आहे. त्यामुळे त्यांनी काही धोरणात्मक निर्णय घेतला असेल तर त्याची माहिती घ्यावी लागेल. मात्र त्यांचा असेल तो निर्णय सर्वांना स्वीकारावा लागेल. अशा शब्दात आपली भूमिका मांडली आहे.
Related Stories
September 28, 2023