• Sat. Sep 23rd, 2023

छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक.…

०६जून १६७४ रोजीचा दिन हा हिंदवी स्वराज्यासाठी सुवर्ण दिन म्हणून ओळखल्या जातो कारण याच दिवशी आपल्या छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची निर्मिती करून “शिवराज्याभिषेक सोहळा” आयोजित केला होता.शिवराय हे परमपराक्रमी तर होतेच शिवाय त्यांची दूरदृष्टी सुद्धा अतिशय तिक्ष्ण होती.त्यांना माहीत होते की,आपण आपल्या स्वराज्यनिष्ठ असणाऱ्या मावळ्यांच्या मोलाच्या योगदानामुळे आपले हिंदवी स्वराज्य जरी निर्माण केले असले तरीपण आपण आजही मोघलांचे मांडलिक म्हणूनच राहणार आहोत.आपल्याला स्वतःचे चलन,राज्यकारभार,न्यायव्यवस्था,करप्रणाली ई.धोरणे ठरविण्याचा स्वतंत्र अधिकार प्राप्त होणार नाही स्वराज्य असून सुद्धा जर आपण प्रजाहित धोरण ठरवू शकत नसलो तर आपल्या हिंदवी स्वराज्याचा काहीच उपयोग होणार नाही.म्हणूनच त्यांनी राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला जेणेकरून आपल्या हिंदवी स्वराज्याची स्वतःची एक ओळख निर्माण होईल आणि आपल्या प्रजेला आनंदाने जगता येईल.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
शिवरायांनी राज्याभिषेक करण्याचे निर्णय घेताच सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरू लागले.शिवरायांचे पराक्रम आणि आपल्या स्वराज्याच्या निर्मितीचा इतिहासाचे गायन चोहीकडे होऊ लागले.जणूकाही धरेवर शिवरांनी स्वर्गाची निर्मितीच केली आणि या स्वर्गात सुखाने जगण्याचा अधिकार प्रत्येकांना दिला जाईल असेच प्रत्येकांना वाटू लागले.पण एकीकडे आनंदाचे वातावरण असताना मात्र शिवरायांच्या विरोधकांनी त्यांच्या राज्याभिषेकाला परवानगी दिली नाही.त्यांचे असे मत होते की,हिंदू धर्मीयांमधून फक्त क्षत्रिय कुळात जन्मणाऱ्या योद्ध्यांना स्वतःचा राज्याभिषेक करण्याचा अधिकार आहे.त्यांचे असे मत होते की,या धरेवर आता क्षत्रिय कोणी राहिले नाही त्यामुळे शिवरायांच्या राज्याभिषेकाचा प्रश्नच उद्भवत नाही.शिवराय हे खूप संयमी आणि विज्ञानप्रिय राजे होते.त्यांनी होत असलेल्या विरोधाचा सामना अतिशय शांतपणे केला.सर्वप्रथम त्यांनी नौदल स्थापन केले व समुद्र उल्लंघन नियमाचा निषेध मोडला आणि समुद्रमार्फत होणाऱ्या आक्रमणाला आळा घातला.त्यानंतर जबरदस्तीने मुस्लिम बनविण्यात आलेल्या नेताजी पालकर व बजाजी निंबाळकर यांना शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात आणले व स्वतः आपण राजपूत घराण्याचे आहोत हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी बाळाजी आवजी,केशवराव पुरोहित व भालचंद्र भट यांना राजस्थान व काशीला पाठवून मेवाडचे सिसौदीया राजपूत घराण्यातील वंशावळ प्राप्त केले यामुळे शिवराय हे राजपूत घराण्यातील आहेत हे सिद्ध झाले व विरोधकी ब्राम्हणांची गळचेपी झाली.शेवटी काशिवरून शिवरायांच्या राज्याभिषेकासाठी प्रख्यात असणारे ब्राम्हण गागाभट्ट यांना बोलवण्यात आले व शिवरायांचा अति हर्षाने रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला.
राज्याभिषेकाच्या वेळी त्यांनी स्वतःच्या राजमुद्रेची निर्मिती केली.शिवशक व होनची निर्मिती करून स्वतःचे चलन अस्तित्वात आले.स्वतंत्र भगवा झेंडा अति हर्षाने उंच फडकू लागला.शिवरायांनी स्वराज्य सथापनेच्या वेळीच राजमंदिर,मंत्रीसभा,धर्मसभा,चित्रसभा,गजशाला,पाककला,कोठ्या,वाडे,बाजारपेठे यांच्या बांधकामाला सुरुवात केली होती.यावरून शिवरांच्या दूरदृष्टीचा प्रत्यय येतो.३२ मन सोन्याच्या सिंहासनावर आरूढ झालेल्या शिवरायांच्या सिंहसनाला न्यायाचे प्रतिक म्हणून तराजू,सागरी शक्तीचे प्रतिक म्हणून मासा व अश्वदलाचे प्रतिक म्हणून घोड्याच्या शेपटाने सजविण्यात आले होते.त्यांना विविध नदीच्या पात्रातून आणलेल्या जलांनी व विधिवत तयार करण्यात आलेल्या पंचामृताने अभिषेक करण्यात आला.शिवरायांचे राज्याभिषेक सोहळ्याला जवळपास २ लाख प्रजा दर्शक म्हणून उपस्थित होते.राज्याभिषेक संपन्न होताच शिवरायांच्या जयघोषाने सारा अंबर दुमदुमू लागला.
या ऐतिहासिक क्षणाचे वर्णन करताना शिवकालीन लेखक सभासद म्हणतात.…”ही गोष्ट असामान्य झाली आहे.या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा,मराठा पातशहा एवढा छत्रपती झाला;ही गोष्ट काही सामान्य जाली नाही.”
एवढे असामान्य कार्य शिवरायांनी घडवून आणले.कदाचित त्यांनी स्वराज्याची स्थापना केली नसती तर आपण सगळे आज जबरदस्तीने मोघलांचे आश्रित राहलो असतो.माणूस म्हणून आपल्याला जगण्यासाठी सुद्धा भिक मागावी लागली असती.आपल्या आयाबहिणी कधीच सुरक्षित नसत्या.सर्वत्र हाहाकार माजला असता आणि आपण अशा जगात सामान्य किटकांप्रमाणे जगलो असतो.पण धन्य आहेत ते शिवराय आणि धन्य त्यांचे मावळे.…ज्यांनी स्वराज्याची निर्मिती करून प्रजाहितकारी शासन निर्माण केले.त्यांच्या शौर्याला आणि त्यांच्या एकनिष्ठतेला सर्वांच्या वतीने माझा मानाचा मुजरा.…
शब्दसखा-अजय रमेश चव्हाण,
तरनोळी
ता.दारव्हा,जि.यवतमाळ
मो.८८०५८३६२०७

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,