कोरोना लसीकरण पूर्ण करणार्‍या ग्रा.पं.ना पाच लाखांचा विशेष निधी

वर्धा : ग्रामीण भागात आजही लसीकरणाबाबत अनेक संभ्रम पाहायला मिळतात. त्यामुळे ग्रामीण भागातील लसीकरणाची टक्केवारी कमी आहे. ज्या ग्रामपंचायती लसीकरण वेगाने पूर्ण करतील, अशा ग्रामपंचायतींना विशेष बाब म्हणून आमदार निधीतून पाच लाख रुपयांचा निधी देण्यात येईल. त्याकरिता नियोजन करावे, असे निर्देश आमदार रणजित कांबळे यांनी अधिकारी, कर्मचारी, सरपंचांच्या ऑनलाईन मिटींगमध्ये दिलेत.
देवळी-पुलगाव विधानसभा मतदार संघाकरिता आमदार रणजित कांबळे यांनी ऑनलाईन मिटींग घेतली. त्यामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, उपजिल्हाधिकारी मनोज खैरनार, तहसीलदार रमेश कोळपे, राजेश सरवदे, श्रीराम मुंदडा, तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंचांची उपस्थिती होती. गावात ९0 टक्के लसीकरण पूर्ण करणार्‍या ग्राम पंचायतींनाही आमदार निधीतून पाच लाख रुपयांचा विशेष निधी देण्यात येईल, असे सांगत, आमदार कांबळे यांनी कोरोनाच्या तिसर्‍या लाटेपासून बचावाकरीता लसीकरणाची गरज व्यक्त केली. सध्या ४५ वर्षांवरील लसीकरण संथगतीने सुरू आहे. लवकरच १८ वर्षांवरील लोकांचे लसीकरण सुरू होईल. तेव्हा केंद्रावर गर्दी राहील.त्यामुळे ४५ वर्षांवरील सर्वांनी तातडीने लसीकरण करावे, असे आमदार कांबळे यांनी सांगितले.
६0 वर्षांवरील वयोगटाच्या बहुतांश नागरिकांचे लसीकरण झाले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत शहरी तर दुसर्‍या लाटेत ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणात रुग्ण आढळलेत. रक्तदाब, शुगर आणि इतर आजाराने ग्रस्त असलेल्यांना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे त्यांनी लवकर लसीकरण करणे आवश्यक आहे. आता लस मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.
सरपंचांनी ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तींचे सहकार्य घेत लसीकरणास जनजागृती करणे आवश्यक आहे. अंगणवाडी सेविका, आशावर्कर, पोलिस पाटील, शिक्षक यांचाही जनजागृतीकरिता सहभाग घ्यावा. लक्षणदिसल्यास किंवा कोणाच्या संपर्कात आल्यास तातडीने चाचणी करून घ्यावी, असे आवाहन आमदार कांबळे यांनी यावेळी केले. कोणालाही लक्षण दिसल्यास तज्‍जञडॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणीही स्वत:च्या मनाने औषध घेऊ नये, मोठे समारंभ टाळावे, गर्दी टाळावी, असे आवाहन केले.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!