मुंबई : मागील दीड वर्षांपासून देशात लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. दरम्यानच्या काळात अनेकांना वर्क फ्रॉम होमचा अवलंब करावा लागला आहे. परिणामी २४ तास पती-पत्नी घरातच असल्याने त्यांच्यात अनेकदा खटके उडत आहेत. दरम्यान कौटुंबीक हिंसाचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पण लॉकडाऊनच्या काळात पत्नींच्या तुलनेत पतीवर होणार्या अत्याचारात वाढ झाल्याचा धक्कादायक खुलासा पुणे पोलिसांच्या ट्रस्ट सेलने केला आहे.
ट्रस्ट सेलच्या प्रमुख सुजाता शानमे यांनी सांगितले की, मागील दीड वर्षात तीन हजाराहून अधिक घरगुती वादाच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. यातील बहुतांशी प्रकरणे मारहाण, शारीरिक आणि मानसिक छळाची आहेत. काही तक्रारींमध्ये असाही दावा केला आहे की, भांडण झाल्यानंतर त्यांच्या बायका मुलांना घेऊन माहेरी गेल्या आहेत. त्या अद्याप परत आल्या नाहीत, त्यामुळे पुरुषांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
सुजाता शानमे यांनी पुढे सांगितले की, २४ तास बंद खोलीत एकटे राहिल्यामुळे नवरा बायकोंमधील मानसिक तणाव वाढत गेला आहे. छोट्या छोट्या कारणांवरून पती-पत्नीमध्ये भांडण होत आहेत. अशा लोकांना कॉलवरून किंवा ऑनलाईन माध्यमातून समुपदेशन करून त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मागील दीड वर्षात स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांच्या छळ झाल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. लॉकडाऊनपूर्वी एका वर्षात १२८३ जणांनी पुणे पोलिसांच्या ट्रस्ट सेलकडे कौटुंबिक वादाच्या तक्रारी केल्या होत्या.
यामध्ये ७९१ तक्रारी बायकाच्या होत्या, तर यामध्ये केवळ २५२ तक्रारी पुरुषांच्या होत्या. पण लॉकडाऊन दरम्यान म्हणजेच मागील १५ महिन्यांत ही घरगुती हिंसाचाराची संख्या वाढून ३ हजार ७५ वर पोहोचली आहे. यामध्ये महिलांवर अत्याचार होणार्या तक्रारीची संख्या १५४0 आहे, तर पुरुषांवरील अत्याचारांची संख्या १५३५ एवढी आहे. पुरुषांवरील अत्याचाराचा आकडा लॉकडाऊनच्या आधीच्या वर्षापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे.
(Images Credit : Lokmat)
Related Stories
March 27, 2024
March 26, 2024
March 24, 2024