• Sat. Jun 3rd, 2023

अक्षय तृतीया;केवळ पुजापाठ नको,कर्तृत्वही हवं..!

अक्षय तृतीया भारतात मोठ्या उत्साहानं साजरा होणारा सण आहे.हा सण हिंदूंचाच नाही तर जैन लोकही या सणाला मोठ्या उत्साहानं साजरा करतात.नव्हे तर या पाठीमागे एक पुरातन परंपरा आहे.

 या दिवसाला साजरा करण्यामागे काही पुरातन परंपरा खालीलप्रमाणे
या दिवशी भगवान परशुरामाचा जन्म झाला.तोच विष्णुचा सहावा अवतार मानला जातो.या दिवशी परशुराम जयंती साजरी करण्याच्या दृष्टीने या दिवसाचे महत्व आहे.गंगा नदीही याच दिवशी भगीरथाने पृथ्वीवर आणली.तसेच या दिवशी गंगेत स्नानाचे महत्व आहे.हिंदू पुराणानुसार याच दिवशी अन्नपूर्णा मातेचाही जन्मदिवस मानला जातो.त्यामुळे या देवीला प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळे पदार्थ या दिवशी बनवून ते अन्नपूर्णा देवीला चढवले जातात.याच दिवशी कुबेराने जास्त धन प्राप्ती व्हावी म्हणून शिवपुरम येथे भगवान शिवाची पुजा केली.याच दिवशी महर्षी वेद व्यास यांनी महाभारत कथा लिहिण्यास प्रारंभ केली.याच दिवशी युधीष्ठराला अक्षय पात्राची प्राप्ती झाली.ज्या पात्राने तो गरीबांना अन्न चारत असे.याच दिवशी दुःशासनाने द्रौपदीचे चिरहरण केले व याच दिवशी भगवान श्रीक्रिष्णाने कधीही न संपणारी अक्षय साडी द्रौपदीला पुरवली.याच दिवशी सुदामा क्रिष्णाचा मित्र क्रिष्णाला मदत मागायला द्वारकेला आला.याच दिवशी ओरीसामध्ये शेतीत वखर चालवला जातो.आणि याच दिवशी बंगालमध्ये व्यापारी वहीखात्याचा हिशोब करतात.ज्याला हलखता म्हणतात.
 पंजाबमध्ये तर याच दिवशी सकाळी उठून शेतकरी शेतात जातात.त्यांना रस्त्यात जे जे पशुपक्षी भेटतात.त्यावरुन पावसाचा अंदाज लावला जातो.
जैन धर्मामध्ये तर या दिवसाला वेगळे महत्व आहे.जैन राजा ऋषभदेव याने आपली संपत्ती आपल्या एकशे एक पुत्राला दान देवून तो सुखप्राप्तीसाठी अरण्यात गेला.त्या काळात त्याने वर्षभर उपवास ठेवला.त्यामुळे त्याचा उपवास सोडण्यासाठी कोणी या राजाला कपडे लत्ते,कोणी घोडे,कोणी हत्ती,तर कोणी राजकन्याही दान दिल्या. पण राजा काही उपवास सोडायला तयार नव्हता.शेवटी अंतर्यामी राजा श्रेयांशस यांनी अंतर्ज्ञानाने ऋषभदेवाची इच्छा ओळखली व त्यांना याच दिवशी उपवासाला उसाचा रस दिला.याला जैन धर्मात पारणाा म्हणतात.
आज लोक वास्तववादी जगत असले तरी त्या वास्तव्यवादी जगण्यात पौराणिकतेची जोड आहे.म्हणूनच आम्ही कितीही वास्तविकतेला मानत असलो तरी नाईलाजानं आमचे सण उत्सव साजरे करीत असतो.बौद्ध मंडळी बैशाखी,बुद्धपौर्णीमा मोठ्या उत्साहानं साजरी करतात.तर हिंदू दिपावली,होळी, दसरा इत्यादी सण साजरा करतात. मुस्लीम ईद साजरी करतात.ख्रिश्चन नाताळ आणि इस्टरडे.यापैकी अक्षय मात्यापित्यांच्या पुजणाचा एक दिवस म्हणून अक्षय तृतीयाही साजरा केला जातो.
 वर्तमानकाळात अक्षयतृतीयेला केवळ माय बापाचीच पुजा करणे तसेच आपआपल्या पिढीत जे पुर्वज झाले.त्यांना पात्रावळीत सुग्रास अन्न टाकून त्यांचं पुजन करणे बस एवढाच अर्थ घेतला आहे.हे पित्तरांना दिलेले जेवण कदाचित या दिवशी केलेले पुण्य कधीच संपत नाही,या अर्थानं हा सण साजरा केला जातो.तसेच ते पुण्यात्मे आशीर्वाद देतात या अर्थानहीे या दिवसाचे महत्व आहे.या दिवशी कावळ्यांना काव काव ये असा आवाज देवून कावळ्यांना जेवण घालण्याचे महत्व आहे.कावळा अन्नाला शिवला की बस आपले पित्तरं जेवले व आपल्याला पुण्य मिळाले असाही एक समज प्रचलित आहे.
आम्ही जीवंतपणी म्हाता-या मायबापाला वृद्धाश्रमात टाकतो आणि मेल्यावर त्यांची पुजा करतो.सगळे पदार्थ पात्रावर टाकण्यासाठी बनवतो.त्यातच एखाद्या कावळ्याला भूक लागली आणि तो त्या पात्राला शिवलाच तर तो परीवार पुण्य परीवार असे आम्ही समजतो.यात कावळ्याचा आणि पुण्याचा संबंध आला कुठून?वर्षभर ज्या कावळ्याला हाकलतो,कापतो, तोच कावळा या दिवशी देव कसा?तरीही त्याला देव मानत आम्ही आमची संस्कृती जोपासतो.कारण आमचे आमच्या संस्कृतीवर प्रेम आहे.मग ज्या अर्थाने आमचे आमच्या संस्कृतीवर प्रेम आहे.त्याच अर्थाने आमचे आमच्या मायबापावर प्रेम का नाही?आम्ही आमच्या मायबापावरही प्रेम करावे,त्यांना वृद्धावस्थेत त्रास देवू नये.जीवंतपणीच त्यांची फार सेवा करावी.मेल्यानंतर कोण पाहते.तरंच अक्षयतृतीयेला पुण्य घडेल.नाहीतर कितीही सुग्रास अन्न पित्तराच्या पात्रावर चढवाल.कितीही कावळे ते अन्न खातील.तरी तुम्हाला पुण्य लाभणार नाही.कारण पाप आणि पुण्य ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत.
 मायबापाच्या सेवेचे महत्व तुमच्या पुराणातही सापडतात.ज्या महाभारत रामायणाला तुम्ही मानता,त्याच रामायणात मायबापाच्या सेवेचे दृष्टांत दिलेले आहेत.काशीला मायबापाची कावळ घेवून जाणारा श्रवण बाळ रामायणातीलच.तसेच पित्याला व मातेला दिलेले वचन पाळून चौदा वर्ष वनवास भोगणारा राम रामायणातीलच.त्याही वरती जावून ज्या क्रिष्णाला जगात मानाचं स्थान आहे.त्या महाभारताची सुरुवात पाहिली का कधी.नसेल माहीत तर माहीती करुन घेवू.राजा शांतनूच्या दोन राण्या.गंगा आणि सत्यव्रती.भीष्म गंगेचा पुत्र.राजा शांतनूने भीष्माला युवराज घोषीत केलं.तेव्हा राणी सत्यव्रती नाराज झाली.तुमच्या पहिल्या पुत्राला राजगादी आणि मी मात्र दासी.मला दासत्व का?याच दासत्वासाठी माझ्याशी विवाह केला का म्हणून राणी शांतनुला सोडून गेली.ही गोष्ट भीष्माला माहीत होताच त्याची मातृपितृभक्ती जागृत झाली व त्याने कधीही विवाह न करण्याची प्रतिज्ञा केली.तीच भीष्मप्रतिज्ञा होय.या भीष्मप्रतिज्ञेच्या बदल्यात शांतनूने देवव्रताला(भीष्माला) इच्छामरणाचा वर दिला.
आई…….मग ती आपल्या आईची सवत का असेना.आई आईच असते.हे रामायण, महाभारत शिकवतं.आम्ही अक्षय तृतीया साजरा करतो.त्या दिवसापुरते मायबाप पित्तरं आठवतो.मोठ्यांची सेवा करावी हेही आठवतो.नव्हे तर या सेवेसाठी आणि पुण्य प्राप्त व्हावं म्हणून दानही करावे म्हणून करतो.पण हा दिवस निघून जाताच आम्ही ही सेवा विसरतो आणि मन मानेल तसे वागू लागतो.हे आमचे कितपत बरोबर आहे?हीच आमची मातृपितृभक्ती असावी काय?ज्या उदरातून आम्ही जन्म घेतो.त्याच उदराला पुढे त्रास देत लोभासाठी त्यांची हत्या करतो?तसेच जे मायबाप आम्हाला हा देव हा दानव हे अंकीत शिकवितात.त्याच मायबापाची तस्वीर भींतीवर लावून त्यांची पुजा करायलाही आम्ही लाजतो.नव्हे तर मायबापाची पुजा करु नका.हे धर्म शिकवितात का?नाही……..तरीही आम्ही ते करतोच.हेही कितपत बरोबर आहे.ज्या दगडाला आम्ही देव मानतो.तोच दगड साक्षात आमच्या पुढे आल्यास आम्ही त्याला ठार करतो.हे तरी कितपत बरोबर आहे?(साप सापाला देव मानण्याची प्रथा)
 या वैज्ञानिक जगात या भौतिक साधनाला देव मानणे सोडा.ज्या पित्तरांसाठी हा दिवस साजरा करताय ना.खरंच सर्वांनी साजरा करा.बंधन नाही.पण………त्याबरोबर आपल्या पितृमातृभक्तीला सदैव जागृत ठेवा.त्यांनी तुम्हाला उन्हातून सावलीत नेलंय.मृत्यूपुर्वी त्यांची सेवा या अक्षयतृतीयेनिमित्याने घडू द्या तुमच्या हातून.तेच सर्वात मोठे दान आहे.हे लक्षात घ्या.अक्षय तृतीया निमित्यानं केवळ पुजापाठच नको.कर्तृत्वही असावे हेही लक्षात असू द्या.
अंकुश शिंगाडे
नागपूर
९३७३३५९४५०

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *