अमरावती, दि. 5 : शहानूर प्रकल्पातून अंजनगाव सुर्जी, दर्यापूर व भातकुली तालुक्यांतील दोन शहरांसह 146 गावांसाठी पाणीपुरवठा योजनेचे पुनरुज्जीवन व बळकटीकरण होणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक प्रस्ताव वेळेत सादर करण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.पालकमंत्र्यांनी आज शहानूरला भेट देऊन पाहणी केली व पाणीपुरवठा योजनेचा बैठकीद्वारे आढावा घेतला. आमदार बळवंतराव वानखडे, सुधाकरराव भारसाकळे, जलसंपदा, जीवन प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.
जल जीवन मिशनअंतर्गत मंजूर आराखड्यानुसार प्रस्तावित 146 गावांसाठी अस्तित्वातील योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. दर्यापूर, अंजनगाव सुर्जी व भातकुली तालुक्यातील खारपाणपट्ट्यातील अनेक गावे त्यात समाविष्ट आहेत. सन 2031 मधील पाण्याची 25.04 एमएलडी मागणी लक्षात घेऊन हे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्र, पाण्याच्या उंच टाक्या, गुरुत्ववाहिनी आदींची दुरुस्ती, वाढीव वितरण व्यवस्थेचे काम पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यानुसार आवश्यक प्रस्ताव वेळेत द्यावेत. आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. शहरे व ग्रामीण परिसरात शुद्ध पेयजल उपलब्ध व्हावे यासाठी शासनाने पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीसह अनेक नवी कामे हाती घेतली आहेत. ती वेळेत पूर्ण प्रशासनाने आवश्यक कामांचे वेळीच प्रस्ताव द्यावेत, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
Related Stories
April 19, 2024
April 16, 2024