मुंबई : लसीकरणामुळे राज्यात दुसरी लाट उसळली असली तरी पोलिसांमधील बाधितांचे प्रमाण तुलनेने कमी असून कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या मात्रेनंतर पोलिस दलातील संसर्गाचा प्रादुर्भाव थोपवणे शक्य होईल, असा विश्वास मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ अधिकार्यांनी व्यक्त केला आहे. मात्र तरीही गाफील न राहता पूर्वीप्रमाणेच आवश्यक काळजी घेऊन कर्तव्य बजावण्याची सूचना आयुक्तालयाने पोलिसांना दिली आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत सर्वसामान्यांच्या सर्वाधिक संपर्कात असलेल्या राज्य पोलिस दलात संसर्ग वेगाने पसरला. पहिल्या लाटेत जमावबंदी, संचारबंदी, टाळेबंदीच्या अंमलबजावणीची जबाबदारी पोलिसांवर होती. मात्र हळूहळू पोलिसांवरील जबाबदारी वाढली. विलगीकरण केंद्रांची सुरक्षा, विलगीकरणातील रुग्ण पसार होऊ नयेत, पसार झालेल्यांच्या शोधासह, परप्रांतीय मजुरांची पाठवणी राज्य पोलिस दलाच्या खांद्यावर सोपवण्यात आली होती. सध्या दुसर्या लाटेच्या पार्श्वभूमी वर जमावबंदीच्या अंमलबजावणीसह इतर वेळेत गर्दी होऊ नये याची खबरदारी घेणे, नियम न पाळणार्यांवर कारवाई आणि प्रतिबंधित क्षेत्रांबाहेर बंदोबस्ताची जबाबदारी पोलिसांवर आहे. मात्र यंदा बहुतांश पोलिसांचा लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. सध्या अतिदक्षता विभागात किंवा व्हेंटिलेटरवर एकही बाधित पोलिस नाही. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यापर्यंत ३0 हजारांहून अधिक पोलिस अधिकारी, कर्मचारी कोरोनाबाधित झाले. तर साधारण ३00 अधिकारी, कर्मचार्यांचा संसर्गामुळे मृत्यू झाला. बाधितांमध्ये ४५ वर्षांवरील पोलिस अधिक होते.