वर्धा:गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा वाढू लागल्याने उन्हाचे चटके लागत आहेत. त्यामुळे एप्रिल महिन्यातच वर्धेकरांना मे-हिट जाणवत आहे. एप्रिलच्या प्रारंभीच शुक्रवारी वर्धेचे तापमान ४२ अंश सेल्सियस एवढे नोंदविण्यात आले.
विदर्भात सर्वांत जास्त तर देशातील चौथ्या क्रमांकाचे हाँट शहर म्हणून चंद्रपूरची ओळख आहे. त्यापाठोपाठ विदर्भात सर्वात जास्त तापमान वर्धेचे नोंदविल्या जाते. यावर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातील ढगाळ वातावारण अन् अधूनमधून अवकाळी पाऊस यामुळे तापमानाचा पारा घसरला होता.
मात्र, होळीनंतर एप्रिल महिन्याच्या प्रारंभीच सूर्य आग ओकू लागल्याचे दिसून येत आहे.
वर्धा जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत पाऊस चांगला पडतो, त्याप्रमाणात उन्हाचे चटकेही सोसावे लागतात. उन्हाळ्यामध्ये तापमानाचा पारा वाढल्यामुळे वातावरणात उष्णता निर्माण होते. उन्हामुळे अनेकांना उष्माघाताला सामोरे जावे लागते.
त्यासाठी नागरिकांनी महत्त्वाच्या कामाशिवाय भर उन्हात काम नसताना बाहेर पडू नये. दरवर्षी विदर्भातील काही जिल्ह्यात उष्णतेची लाट येते. त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढत चालला आहे.या आजारात शरीराचे तापमान वाजवीपेक्षा जास्त म्हणजे १0२ फँरनहीट किंवा त्यापेक्षा जास्त झाल्याने अवयवांना इजा पोहोचून ग्लानी येऊन रुग्ण बेशुद्ध पडतो. त्याला वेळीच उपचार न मिळाल्यास मृत्यूही ओढावू शकतो. त्यासाठी उन्हाळ्यामध्ये आरोग्य सांभाळण्याची गरज आहे.