मुंबई :किमान महाराष्ट्रासारख्या कोरोनाबाधीत राज्यांमध्ये तरी केंद्राने नियम शिथिल करून मागेल त्याला कोरोना लस देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी प्रत्येक नागरिकाला लस देण्याची केलेली मागणी योग्य असल्याचे अशोक चव्हाण यांनी यावेळी म्हटले.
राहुल गांधी यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला लस घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. त्यांची ही मागणी योग्य असून, केंद्राने प्रारंभी किमान महाराष्ट्रासारख्या कोरोना रूग्णांची संख्या जास्त असलेल्या काही राज्यांमध्ये तरी नियमात शिथिलता आणून लसीकरणाचे प्रमाण वाढवले पाहिजे. कोरोनाच्या नव्या लाटेत तरूणांमध्येही संक्रमणाचे प्रमाण वाढताना दिसते आहे. त्यामुळे आता केवळ ज्येष्ठ नागरिक किंवा ४५ वर्षांवरील नागरिक अशी र्मयादा न ठेवता १८ वर्षांहून अधिक वयाच्या प्रत्येकासाठी मागेल त्याला लस देण्याचे धोरण स्वीकारण्याची गरज आहे, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनने देखील १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक नागरिकाला लस देण्याची परवानगी असावी, अशी मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कोरोना लस उत्पादकांशी चर्चा करून त्यांच्या उत्पादन क्षमतेत वाढ करावी आणि सुरूवातीला महाराष्ट्रासारख्या अतिबाधीत राज्यांमध्ये लसीकरण मोहिमेसाठी अधिकाधिक लसींची उपलब्धता करून द्यावी, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे.
मागेल त्याला लस द्या-अशोक चव्हाण
Contents hide