नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात कोरोनाने मगरमिठी आवळली आहे. कोरोना प्रसाराचा वेग प्रचंड वाढला असून, दिवसेंदिवस रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. विशेष म्हणजे देशातील काही जिल्ह्यांत कोरोनाचा उद्रेक झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले असून, या जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राने राज्यांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. नवीन कृती कार्यक्रम केंद्राने हाती घेतला असून, राज्यांनाही सूचना दिल्या आहेत.
महाराष्ट्रासह काही राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. चिंतेची बाब म्हणजे दुसर्या लाटेने तर महाराष्ट्रातील रुग्णसंख्येचे आतापर्यंतचे उच्चांक मोडीत काढला आहे. त्याचबरोबर इतरही सात राज्यात कोरोनाने डोके वर काढल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना कोरोना नियंत्रणासाठी कृती कार्यक्रम दिला आहे.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी याबद्दलची मंगळवारी माहिती दिली. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. राज्य सरकारने त्या जिल्ह्यांमधील ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण दोन आठवड्यात पूर्ण करावे. लसीकरण करताना ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य दिले जावे. त्याचबरोबर कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या २५ ते ३0 जणांचा शोध घ्यावा, त्यांच्या विलगीकरणाची व्यवस्था करण्यात यावी, जेणेकरून कोरोना रुग्णसंख्या कमी करण्यात यश येईल, असे केंद्राने म्हटले आहे.
राजेश भूषण यांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना यासंदर्भात पत्रही पाठवले आहे. कोरोना नियंत्रणासाठी राज्यांनी पोलिस कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारांचा जिल्हास्तरावर योग्यपणे वापर करायला हवा. कंटेनमेंट झोन असलेल्या परिसरातील कोरोना पॉझिटिव्ह लोकांना वा कुटुंबांना घरातच क्वारंटाइन केल्याने फार परिणामकारक ठरणार नाही. त्याऐवजी कंटेनमेंट झोन करून नियमांची कठोर अंमलबजावणी करावी लागेल. टेस्टिंग, ट्रॅकिंग आणि ट्रिटमेंट यावर भर देण्यात यावा आणि जिल्हास्तरावर कृती कार्यक्रम तयार करण्यात यावा, असेही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना सांगितले आहे.
कोरोना हॉटस्पॉट जिल्ह्यांत संपूर्ण लसीकरण करा : केंद्र सरकारचे राज्यांना निर्देश
Contents hide