मुंबई : शेतकरी बांधवांना दिवसा आणि पुरेशी वीज देणे शासनाची प्राथमिकता असून, महाकृषी ऊर्जा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत कृषी ऊर्जा पर्वाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विधान भवनात करण्यात आला. सर्व देश, राज्यांमध्ये लॉकडाऊन असताना शेतकरी बांधव मात्र कर्तव्यावर होते, असे सांगून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश कार्यालयीन कामे वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून केली जात होती. शेतकर्यांनी लॉकडाऊन केले असते, तर कठीण परिस्थिती निर्माण झाली असती. इतरांसाठी मळे फुलवणार्या शेतकर्यांच्या आयुष्यात काटे येऊ नयेत, यासाठी त्यांच्या पाठीमागे सरकार ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली.
पुढे बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, जगाचे कामाचे तास सूर्यप्रकाशात असतात आणि शेतकर्यांचे मात्र रात्रीचे कशासाठी. ऊन, वारा, पाऊस अशा सर्व संकटांचा मुकाबला करत तो जगासाठी सोने पिकवत असतो. त्याच्या आयुष्यात सुख, समाधानाचे क्षण कसे येतील, हे पाहणे सरकारचे काम आहे. घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ, असे आम्ही होऊ देणार नाही. शेतकर्यांच्या आशीवार्दाची ताकद मोठी असते. ती जेवढी जास्त मिळेल तेवढा काम करण्याचा हुरुप वाढतो. त्या जोरावर आम्ही शेतकर्यांसाठी जे जे करणे शक्य आहे ते निश्चितच करू, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना दिले. शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्यास आमचे प्राधान्य असून, नुकतेच नीती आयोगासोबत झालेल्या बैठकीत पीक विम्याचा प्रश्न उपस्थित केला असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत कृषी ऊर्जा पर्वाच्या शुभारंभावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, ऊजार्मंत्री डॉ. नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे आदी उपस्थित होते.