मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १५ वर्धापन दिन साजरा करण्यात आला. कोरोना संकटामुळे वर्धापनदिनाचा मेळावा रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून महाराष्ट्र सैनिकांना मार्गदर्शन केले. अनेक पराभव पचवूनही गेली १५ वर्षे साथ देणार्या मनसैनिकांचे राज ठाकरे यांनी आभार मानले. मी तुम्हाला कधीही विसरणार नाही, असा शब्दही राज यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.
आपल्या व्हिडीओ संदेशात राज ठाकरे यांनी मनसेच्या स्थापनेच्या वेळच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. १५ वर्षांपूर्वी पक्षाची स्थापना झाली तेव्हा माझ्या मनात एक धाकधूक होती. मी महाराष्ट्रासाठी नवं काहीतरी उभं करण्यासाठी बाहेर पडलो होतो. पण ते कसं स्वीकारलं जाईल की नाही याविषयी शंका होती. पण १९ मार्च २00६ च्या स्थापना मेळाव्याला आलेली अचाट गर्दी पाहून ही शंका दूर झाली, असं राज यांनी म्हटले आहे.
१५ वर्षांपूर्वी माझ्यासोबत आलेली महाराष्ट्र सैनिकांची ती संपत्ती आजही माझ्यासोबत टिकून आहे. कितीही खाचखळगे आले, अडचणींचा डोंगर आली तरी ती शक्ती माझ्यासोबत आहे, यासारखा दुसरा आनंद नाही. काही जण सोडून गेले, जाऊ द्यात. पण माझ्यासोबत सहय़ाद्रीच्या कड्यासारखे टिकून आहेत, त्यांना मी कधीही विसरणार नाही. पक्षाला जे जे यश मिळेल, त्याचे वाटेकरी तुम्हीच असाल. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र तुमच्याच हातून घडेल, असा विश्वासही राज यांनी व्यक्त केला आहे.
कोणतीही धनशक्ती, राजकीय पार्श्वभूमी नसताना समाजकारणात व राजकारणात मनसैनिकांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. मराठी भाषेसाठी, मराठी माणसाच्या हितासाठी, त्यांच्या न्याय्यहक्कांसाठी व स्वधर्म रक्षणासाठी हजारो आंदोलने केली. मोर्चे काढले. अटका व जेलवार्या कराव्या लागल्या. मनसैनिकांच्या या त्यागाबद्दल माझ्या मनात कृतज्ञता आहे. महाराष्ट्राच्या मनातही ही भावना सदैव राहील. पराभव पचवूनही तुमच्यातील लढण्याची उर्मी कमी झाली नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक घटकाला आजही वाटते की त्यांचा प्रश्न मनसेच सोडवू शकते, या विश्वासातच भविष्यातील उष:कालाची बिजे रोवली आहेत हे विसरू नका. तुमचे र्शम, रक्त वाया जाणार नाही, अशी ग्वाही राज यांनी कार्यकर्त्यांना दिली आहे. वर्धापन दिनानिमित्त १४ मार्चपासून पक्षाची सदस्य नोंदणी सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.