चांदुर रेल्वे : अमरावती जिल्हयात गेल्या दोन दिवसांपासून वादळी वार्यासह सुरू असलेल्या पावसामुळे शेतीपिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. अमरावती जिल्हयातील जवळपास १४ ही तालुक्यामध्ये पावसाचा जोर पहावयास मिळाला. अमरावतीचे नंदनवन असलेल्या चिखलदर्यासह काही भागात गारपीटसुध्दा झाल्याने याचा शेतकर्यांना मोठा फटका बसला आहे. चांदूर रेल्वे तालुक्यात वादळी वार्यासह पावसाच्या कहरमुळे तसेच काही गावांत झालेल्या गारपिटीचा गहू, कांदा, संत्रा, हरभरा पिकांना फटका बसला आहे. या अवकाळी पावसाने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच मोठी झाडे सुध्दा पडल्याची माहिती आहे.गेल्या काही महिन्यांपासून शेतकर्यांना अवेळी येणार्या पावसाचा मोठा सामना करावा लागत आहे. प्रत्येक पिकाच्या वेळी शेतकर्यांवर नैसर्गिक संकट ओढावत असल्याचे दिसून येत असुन यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. काही दिवसांपूर्वी हवामान खात्याने अंदाज व्यक्त केल्याप्रमाणे गुरूवारी रात्री अमरावती जिल्ह्यात अनेक तालुक्यात गारपीटसह मुसळधार अवकाळी पाऊस बरसला. यामध्ये चांदूर रेल्वे तालुक्याचा सुध्दा समावेश आहे. चांदूर रेल्वे तालुक्यातील आमला (विश्वेश्वर) भागात वादळी वार्यामुळे रामराव सीताराम कुबडे व इतर अनेक शेतकर्यांचे गहू अक्षरश: जमिनीवर झोपले. त्यामुळे या भागात गव्हाचे चांगलेच नुकसान झाले असुन याबाबत पं. स. उपसभापती प्रतिभा डांगे यांनी पाहणी सुध्दा केली. याशिवाय मालखेड परिसरात गारपिटीमुळे अनेक शेतकर्यांच्या कांदा पिकाला मोठा फटका बसला आहे. तसेच मालखेड येथील शेतकरी मनोहर गुल्हाने यांच्या संत्रा पिकाचे व मालखेड येथील शेतकरी विजय मारोतराव अंबाडकर यांच्या शेतीतील भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर मांजरखेड (कसबा) व बासलापूर भागात संत्रा, गहू, हरभरा पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
Related Stories
April 16, 2024