मुंबई : २0२0 मध्ये जेव्हा जगभरात कोरोनाचा प्रकोप सुरू होता, तेव्हाही महाराष्ट्रात उद्भवली नव्हती अशी परिस्थिती आता उद्भवली आहे. दररोज नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत विक्रमी वाढ होऊ लागली आहे. मध्यंतरी रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने बंद केलेले कोविड सेंटर आता पुन्हा सुरू करण्याची नामुष्की ओढावलेली आहे. औरंगाबादमध्ये रुग्णांना बेड मिळवण्यासाठी तासन्तास वाट पाहावी लागतेय. हॉस्पिटलचे उंबरठे झिजवावे लागतायत. तरीही काही रुग्णांच्या पदरी निराशाच येतेय. दुसरीकडे सरकारी रुग्णालयात औषधे नाहीत, म्हणून गरीबांना स्वत:च्या वस्तू विकून औषधोपचार करावे लागत आहेत.
जागा आणि औषधांची कमतरता असल्याचे औरंगाबादच्या पालकमंत्र्यांनीही मान्य केले आहे. उपराजधानी नागपुरातील स्थिती वेगळी नाही. शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात एका बेडवर दोन रुग्णांना ठेवण्यात आलेले आहे. धक्कादायक बाब म्हणजे ऑक्सिजनवर असलेले रुग्णांनाही एकाच बेडवर झोपवण्यात येतंय. महापालिका मात्र बेड्स उपलब्ध असल्याचा दावा करते आहे.
- कुठे किती बेड भरले?
- नागपुरात सध्या ८0 टक्के बेड्स भरले आहेत. तर व्हेंटिलेटरचे ७0 टक्के बेडही भरले आहेत.
- औरंगाबादमध्ये ८0 टक्क्यांपेक्षा जास्त बेड्स भरलेत.
- तर ठाण्यात जवळजवळ ७0 टक्के बेड्स फुल झालेत.
- जळगावात ५0 ते ६५ टक्के बेड्स भरलेत.
- देशात पहिल्या क्रमांकावर असलेल्या पुण्यात तर ९0 टक्के बेड्स भरलेत.
सगळ्या राज्यातच कमी-अधिक प्रमाणात ही स्थिती आहे. एकीकडे बेड्स आणि औषधांची कमतरता जाणवत असताना रुग्णांची संख्याही वेगाने वाढत आहे. तेव्हा लवकरच जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देणे ठाकरे सरकारसमोर सध्याच्या घडीचे मोठे लक्ष्य असणार आहे.