अमरावती : कोरोना प्रतिबंधक लसीच्या रूपाने संरक्षणाचे कवच उपलब्ध झाले आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईला यामुळे बळ मिळाले आहे. ही लस सर्वांपयर्ंत पोहोचणार असून, सध्याच्या टप्प्यात ज्येष्ठांचे लसीकरण होत आहे. ही लस पूर्णत: सुरक्षित असून, सर्व ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. तरूणांनीही आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचे लसीकरण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी आज जिल्हा रूग्णालयाच्या नसिर्ंग स्कूलमधील लसीकरण केंद्रात जाऊन कोरोना प्रतिबंधक लस घेतली.
आमदार बळवंतराव वानखडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या दिव्यांग विभागाचे प्रदेशाध्यक्ष किशोर बोरकर, माजी महापौर विलास इंगोले, बबलू शेखावत, पालकमंत्र्यांचे ओएसडी प्रमोद कापडे यांच्यासह स्टाफमधील इतर ज्येष्ठांचेही लसीकरण झाले. माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम आदी यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, कोरोना प्रतिबंधासाठी लस आल्याने मोठी उपलब्धी झाली आहे. प्राधान्याने ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित करण्यासाठी चालू टप्प्यात ज्येष्ठांचे लसीकरण होत आहे. त्याचबरोबर, इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील नागरिकांनाही लस देण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाकडून २७ ठिकाणी विनामूल्य लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याशिवाय, खासगी रूग्णालयातही अडीचशे रुपए भरून लसीकरण करता येते.ही लस पूर्णत: सुरक्षित आहे. लसीमुळे शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होऊन संरक्षक कवच प्राप्त होते. त्यामुळे कुठलीही शंका न ठेवता सर्व ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. तरूणांनीही आपले मातापिता व कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी केले.लसीकरणाच्या विस्तारासाठी संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेऊन लसीकरण केंद्रांची संख्या वाढवावी. ग्रामीण भागात केंद्रे सुरू करण्यासाठी आवश्यक तयारी ठेवावी, असे निर्देशही त्यांनी आरोग्य यंत्रणेला दिले.लस उपलब्ध झाली असून, ती सर्वांपयर्ंत पोहोचणार आहे. दरम्यान, साथीच्या नियंत्रणासाठी कोरोना प्रतिबंधक दक्षता त्रिसूत्रीचे पालन होणेही तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित अंतर, मास्कचा व सॅनिटायझरचा वापर नियमित करावा, असे आवाहनही त्यांनी केले. कोरोना प्रतिबंधक उपचार करणा-या खासगी रूग्णालयांना शासनाकडून उपचाराबाबत दर निश्चित करून दिले आहेत. त्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी. ही नफा कमावण्याची नव्हे, तर सेवेची वेळ आहे, याचे भान ठेवावे. नियमभंग करणा-यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.