मुंबई: महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमानी प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे. ही हास्यजत्रा सगळ्यांच्या टेन्शनवरची मात्रा ठरली आहे. हास्यत्रेचे ३00 भाग नुकतेच पूर्ण झाले आहेत. प्रेक्षकांच्या प्रेमाच्या बाबतीत हास्यजत्रा नेहमीच नशीबवान ठरली आहे. आता ही हास्यजत्रा आठवड्यातले चार दिवस म्हणजे सोमवार ते गुरुवार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
कार्यक्रमाच्या पहिल्या भागापासून हास्यजत्रेला प्रेक्षकांचे प्रेम मिळू लागले. ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानी सुरुवातीलाच समीर चौघुले, विशाखा सुभेदार आणि प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव ह्या अफलातून विनोदवीरांच्या दोन जोड्या महाराष्ट्राला मिळाल्या. नव्या जुन्या विनोदवीरांच्या एकत्रित सादरीकरणानी यातल्या सर्वच कलाकारांना आणि विनोदवीरांच्या सर्व जोड्यांना महाराष्ट्रानी डोक्यावर घेतले आहे. अरुण कदम, पंढरीनाथ कांबळे, प्रभाकर मोरे ह्या अनुभवी विनोदवीरांबरोबर गौरव मोरे, वनिता खरात, ओंकार भोजने, श्यामसुंदर राजपूत, शिवाली परब, प्रियदर्शिनी इंदलकर, रसिका वेंगुर्लेकर, निखिल बने, दत्तू मोरे, निमिष कुलकर्णी हे सर्व कलाकार आज मराठी रसिकांचे लाडके झाले आहेत.
कोविड काळात अस्वस्थ असलेल्या लोकांना, रुग्णांना, कोवीड योद्ध्यांना, डॉक्टर्स, कर्मचारी, पोलीस अशा अनेकांना या कार्यक्रमानी दोन घटका रमवले, हसवले. या कार्यक्रमामुळे त्यांना काही क्षण आपल्या त्रासाचा, दु:खाचा, वेदनेचा विसर पडला, आणि या कार्यक्रमाचे हे खूप मोठं यश आहे.
दोन दिवस हास्यजत्रा पाहून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन व्हायचे. आता तर टेन्शनवरची ही मात्रा ४ दिवस मिळणार आहे. कॉमेडीच्या या चौकाराने प्रेक्षकांचे टेन्शन नक्कीच तडीपार होणार.
आता दोन नव्हे तर आठवड्याचे चार दिवस प्रेक्षकांना हसवून लोटपोट करणार विनोदवीर
Contents hide