- ऊचापतीचे मेंबर
तसं पाहिलं तर पौगंडावस्थेचा काळ जीवनातील झंझावाती कालखंड असतो. या वयात काहीतरी भव्यदिव्य करावसं वाटत असते. याला आमचं मित्रमंडळ अपवाद नव्हतेच. शिकत असताना उन्हाळी सुट्टीत गावी आल्यावर आम्ही मनसोक्त खेळायचो. तासनतास नत्थु पाटलांच्या चक्कीवाल्या विहिरीत पोहायचो, गोबरु कारभारी यांचे गोठ्यात पैशाने वा कवड्याने पत्ते खेळायचो .परेल, किटी, रमी या साऱ्याच खेळात आम्ही माहिर होतो. दगडी गोळ्या, पकान, कांचे, सारं सारं खेळायचो. दिवसा नत्थु पाटलांच्या आमराईत डाबडूबली,आणि रात्री त्याच आमराईत कधीकधी आंबे चोराला पण जायचो.
गावातील धार्मिक कार्यात आम्हाला तेवढा रस नसे. भजन, किर्तन, भागवत याला अपवादानेच जायचो. पण सिनेमाची गाणी, डायलाँग, स्टोरी सांगणे,मोठमोठ्याने समूहगाणे म्हणने यात मजा वाटायची. आमच्या अशा उपद्व्यापामुळे लोकांच्या नजरेत आम्ही टारगट उनाड मुले होतो. दिवसभर लहान लेकरासारखा रेडिओ आमच्या काखेत असायचा रेडिओच्या वेगवेगळ्या स्टेशनवरील गाण्याच्या वेळा अगदी तोंडपाठ होत्या.
1978-79ची ती घटना असावी. भिकू डॉक्टरच्या घराजवळ बैलगाडीवर आम्हि 4 मित्र बसलो होतो, बुधवारी 8ते9चा ‘बिनाका गितमाला’ऐकल्यानंतर आमच्या त्या वयातील गप्पा सुरू झाल्यात. कळले कि, आपल्या एरियातील एका मुलीसाठी गावातील एक मुलगा नेहमीच घिरट्या घालतो. अन् आमचं एरियाप्रेम जागं झालं. बस्स त्याचा बंदोबस्त कसा करायचा हे आम्ही ठरवलं. डाँक्टरच्या खिडकीवर त्या मुलीचे नाव लिहून, खाली.”…. पाटलांचा मोकाट कुत्रा तांड्यात भटकतो. “असे लिहीले. (त्या मुलामुलींचे नाव विचारू नका please) रात्री 10ः00,साडेदहा वाजता आम्ही आपापल्या घरी निघून गेलो.
दुसर्या दिवशी सकाळपासूनच अनेकांनी ते वाचले. एकाने दुसऱ्याला, दुसर्या ने तिसर्या ला अशी सर्वत्र चर्चा सुरू झाली. दुपारपर्यंतच करंगळीच्या सापाचे रूपांतर आजगरात झालं. मुलीचे आईवडिल, नातेवाईकांनाही माहित झालं. त्यानी कसून चौकशी सुरू केली अन् कळलं कि रात्री उशिरापर्यंत 4मुलेगाडीवर बसली होती, त्यांचच हे काम असावं. अशाप्रकारे आमची नावे समोर आली. त्यानी गावातील पाचपंच बोलावले .रामचंद्र खिरू, जंगल्या मुळ, फुल्या बाळणोत, किसना सरपंच, भिक्या डॉक्टर, मोहन थावरू, मेरचंद मोत्या,दिना गरदाल असे 50/60लोक गोळा झालेत. आम्हाला अगोदरच थोडी कुणकुण लागली होती. आणि आमच्या घरी बोलावणे आले,तेव्हा आम्ही फारच घाबरलो होतो. हिम्मत बांधून तिथं गेलो. पंचानी लिखानाबाबत विचारल्यावर आम्ही पहिल्यांदा सपशेल नाकबूल झालो. पण जंगल्याने जेव्हा दटावून विचारले कि तुम्हीच रात्री उशीरापर्यंत बसले होते, तुम्हीच ते लिहिले, आमच्याजवळ पुरावा आहे त्याने तुम्हाला लिहिताना पाहिलं. तेव्हा मात्र आम्ही फारच घाबरलो एकमेकाच्या तोंडाकडे पाहायला लागलो. शेवटी सारंच कबूल करावं लागलं.
मग आम्हाला एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे जमावाच्या मध्यभागी बसवलं. आम्ही त्याकाळी मनाप्रमाणे वागायचो, कोणाचच ऐकत नसल्यामुळे आमच्या उपद्व्यापा मुळे त्रस्त झालेल्या लोकाना फारच आनंद झाला होता. कारण आता आम्ही पुरते त्यांच्या तावडीत सापडलो होतो.
गर्दीतून एक आवाज आला-
“यांना पोलिसात द्या. पोलिसांचे दंडे ढूंगणावर पडतील तेव्हाच हे सुधरतील”
दुसरा आवाज आला
-“होऽहोऽ पोलिसात द्या. लोकायच्या लेकीबाईची इज्जत काय रस्त्यावर पडली आहे काय? ”
रामचंद खिरू मधातच म्हणाला -“या चौघांनाही उलटे टांगा, खालून मिरच्यांची धुरी द्या. ”
जंगल्याचा आवाज आला-“ई कुसन्यार कुंडा बक्कम माजगो साळो, केरीच सामळेनी.”
दास्याचा देऊ मधेच चाबरला, “यांना शेणात भिजवून पाच पाच चपला हाणा.”
पुन्हा लगेच एक आवाज आला-“शेणात नाही…… भिजवुन पाच पाच जोडे मारा. ”
कोणी काही म्हणे, कोणी काही.आम्ही मात्र सगळं मुकाट्यानं ऐकत होतो. एकाच्याही नजरेला नजर भिडविण्याची आमची हिम्मत होत नव्हती. काही फारच घान शिव्या द्यायचे पण आमचा काहीच ईलाज चालत नव्हता. वाटत होते की इथून पळून जावे पण चारही बाजूनी लोकांचा गराडा पडला होता. जाता ही येत नव्हतं.
बराच वेळ आमचं नेमकं काय करावं याबाबत त्यांची मते मतांतरे चालली, शेवटी ठरलं– यांना माफी मागायला लावायची आणी दोन दोन चपला मारायच्या. मग आम्हाला कान धरायला लावले आणि यापुढे आम्ही असे धंदे करणार नाही असे वदवून घेतले. दिना गरदालने प्रतेकाच्या पाठीवर दोन दोन टायर्र्या चपला लगावल्या. (ते तरी बरं झालं कशातच भिजवून नव्हत्या)
दुसर्या दिवशी सर्व गावात आमच्या फजितीचीच चर्चा होती. घराच्या बाहेर निघावसं वाटत नव्हतं.मी तर सुट्टी संपायच्या आधीच औरंगाबाद जवळ केलं. बाकीचे सुध्दा सुट्या संपल्यानंतर आपापल्या शाळेत निघून गेलेत. नंतर पत्राद्वारे एकमेकांना त्या घटनेबाबत बोलायचो. आणि तेव्हापासूनच आम्ही एकमेकांना गमतीने “ऊचापतीचे मेंबर “म्हणवून घ्यायला लागलो.
- -आर. के. वरघट